लंडन – करोना रोगाच्या प्रसारामुळे जगभर जे आर्थिक नुकसान झाले आहे त्यातून किमान आणखी शंभर कोटी लोक दारिद्य्राच्या खाईत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा निष्कर्ष एका पहाणीतून पुढे आला आहे. लंडन येथील किंग्ज कॉलेज व ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल युनिव्हर्सिटीने ही पहाणी केली. मध्य उत्पन्न गटातील देशांतल्या लोकांना याचा मोठा फटका बसणार असून जगातील गरीबांच्या उत्पन्नात रोज किमान पाचशे दशलक्ष डॉलर्सची घट होईल, असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे.
बांगलादेश, भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि फिलिपाईन्स या अशियातील देशांमध्ये राहणाऱ्या लोकांना हा फटका अधिक तीव्रतेने बसणार आहे असे या अहवालात म्हटले आहे. हा रोग विकसनशील देशांमध्ये मोठे आर्थिक संकटही फैलावत आहे. जे लोक किचिंत दारिद्य्र रेषेच्या वर आले आहेत, त्यांना हा धोका अधिक आहे. त्यांच्या उत्पन्नात होणारी घट त्यांना दारिद्य्रात लोटणारी ठरू शकते आणि तब्बल शंभर कोटी लोकांपुढे हे संकट उभे आहे.
संयुक्तराष्ट्रांच्या युनिर्व्हसिटी वर्ल्ड इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक रिसर्चच्या अहवालात हे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत. जगात दारिद्य्र निर्मूलनाचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला करोनामुळे मोठा फटका बसणार असून या बाबतीत जग किमान 30 वर्ष मागे जाण्याचा धोका आहे असाही यातला गंभीर निष्कर्ष आहे. जागतिक नेतृत्वाने या बाबतीत तातडीने योग्य पावले टाकण्याची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे.