ऊसतोड मजुरांचा राजेगाव परिसरात डेरा ः जगण्याचा संघर्ष कायम
राजेगाव, दि. 15 (वार्ताहर) – शेकडो मैलांचा प्रवास पार करत ऊसतोड मजुरांची कुटुंबे भाकरीचा चंद्र शोधत राजेगाव (ता. दौंड) परिसरात दाखल झाली आहेत.
ऊन, वारा, थंडी, पाऊस आदी नैसर्गिक अडचणींसह इतर समस्यांचा संघर्ष करत जगण्याची प्रेरणा देणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांची व्यथा डोळ्यांच्या कडा ओलावणारी आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गावाकडचे सर्व व्यवहार आणि जिव्हाळ्याच्या माणसांना राम राम करत अनोळखी गावी जाऊन आपला उदरनिर्वाह करणे किती अवघड असते, ते या ऊसतोड कामगारांकडून समजते. पोटची मुले आपल्या मदतीसाठी सोबत आणून त्यांच्या शिक्षण, आरोग्याचाही विचार न करता या चिमुकल्या हातांमध्येही कोयता देण्याची वेळ या कामगारांवर येते, ही बाब वेदनादायी आहे.
गेल्या वर्षी दुष्काळाने संपूर्ण महाराष्ट्र व्याकुळ झाला होता. या संकटावर मात करत पुन्हा नव्याने शेतकरी, ऊसतोड कामगार कसाबसा सावरला. मात्र, सध्याच्या ओल्या दुष्काळाने या कामगारांचे संसार उघड्यावर पडले आहेत. जगण्यासाठी आपल्या हक्काचे गाव सोडून, पाठीवर संसार घेऊन आयुष्यभर भटकंती करणाऱ्या या कुटुंबांना कधी न्याय मिळेल, हेही सांगता येत नाही.
- शैक्षणिक-आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष
एरवी प्रशासनाकडून प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे, ही हाक या चिमुरड्यांपुढे अपवाद ठरते. ना शिक्षण सुविधा ,ना आरोग्याच्या सुविधा, यामुळे शेकडो किलोमीटर दूर येऊनही या चिमुरड्यांना मूलभूत गोष्टीही देण्याबाबत आजतागायत कोणतीही शासकीय योजना पूर्णपणे यशस्वी झाली नाही. - उघड्यावरचे संसार
राजेगाव, मलठण (ता. दौंड) येथे ठिकठिकाणी या ऊसतोड कामगारांचे संसार येऊन पडले आहेत. त्यात उघड्यावरच धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू, बैलगाड्यांचे अवशेष, डोक्यावर हातभर केस वाढलेली आणि उघडी लहान मुले हा त्यांच्या जगण्यासाठी असलेला खटाटोप त्यांची दयनीय अवस्था स्पष्ट करण्यास पुरेसा आहे.
कर्जाचा भार उतरवण्यासाठी धडपड
शेतातील उसाच्या फडात सर्व कुटुंबाने सपासप वार करत आपल्या अंगावर असलेल्या कर्जाचा बोजा एक एक उसाचे टिपरू तोडून कमी करायचा, एवढेच ध्येय उराशी बाळगून पोटाची भूक भागवण्यासाठी हा ऊसतोड कामगार वर्षानुवर्षे काम करीत आहे.
इथं पोटाचं पडलंय; “साळं’चं काय घेऊन बसताय…!
ऊसतोड कामगारांची कुटुंबे राजेगाव परिसरात दाखल झाली असून, शाळा सोडून आपल्या आई-वडिलांच्या मदतीला लहान मुलेही बरोबर आली आहेत. आता या मुलांच्या शिक्षणाचे काय, असा प्रश्न विचारला असता “इथं पोटाचं पडलंय..”साळं’चं काय घेऊन बसताय…’ हे टोळीतील एका आईचे वाक्य ऐकू महासत्ता होऊ पाहत असलेल्या देशात नक्की काय चालले आहे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.