वाठार – रेठरे बुद्रुकसह कृष्णाकाठ परिसरात गत तीन दिवसांपासून पूरपरिस्थिती कायम असून पुराचा तडाखा बसलेली शेकडो कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. स्थलांतरित कुटुंबाची सोय रेठरे बुद्रुक येथील ताराबाई विद्यालय तर काही कुटुंबांची कृष्णा कारखाना येथील कृषी महाविद्यालयात केली आहे.
रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवरील पुलावरून महापुराचे पाणी वाहू लागल्याने पुराची भीषणता वाढली आहे. कृष्णा काठावरील, आटके, जाधवमळा, रेठरे खुर्द, वाठार, मालखेड आदी गावातील कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. तसेच वीज महामंडळाचे डीपी पाण्यात बुडाल्यामुळे गत तीन दिवसांपासून रेठरे बुद्रुकसह परिसरात वीज बंद आहे.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण तसेच ना. अतुल भोसले यांनी पूरग्रस्थ लोकांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच डॉ. अतुलबाबा भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीने पूरग्रस्त लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाठार येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने तेथे टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. धुवॉंधार पाऊस सुरू असल्यामुळे आणखी काही दिवस पूरपरिस्थिती कायम असण्याची शक्यता आहे.