विठ्ठल वळसे पाटील
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारी लढायांबरोबर मिठाचा सत्याग्रह हे एक महत्त्वाचे आंदोलन असून यास भारतीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या पाठीवर हा अद्वितीय लढा आहे. जो मिठासाठी लढला गेला आहे. महात्मा गांधी यांनी आरंभलेल्या सत्याग्रहाने देशभर ब्रिटिश विरोध सामान्य जनतेत निर्माण झाला होता. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त या आंदोलनाची आठवण…
महात्मा गांधी यांचे 150वे जयंती वर्ष साजरे होत असून मिठाचा सत्याग्रहाला जगातील प्रमुख दहा प्रभावशाली चळवळींमध्ये अमेरिकन टाइम मासिकाने स्थान दिले आहे. ब्रिटिश भारतात व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते बनले. येथील समाजाला गुलाम बनवण्यासाठी त्यांनी जीवनाला आवश्यक असलेल्या मिठावर कर लादले. मिठावर लावलेला कर फारच जाचक असल्याने मिठाची तस्करी होत असे. बेकायदेशीर वाहतूक वा तस्करी होऊ नये म्हणून मिठावर नियंत्रणासाठी काटेरी कुंपणही तयार केली होती. या कुंपणावर जागोजागी चौक्या उभारण्यात आल्या होत्या. 1757मध्ये प्लासीचे युद्ध ब्रिटिशांनी जिंकल्यावर मिठावर एवढा कर लावला की एक वर्षाच्या मिठासाठी एका मजुराला दोन महिन्यांचा पगार मोजावा लागत होता. 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीचे सरकार बरखास्त झाले आणि ब्रिटिश सरकारचे भारतावर प्रत्यक्ष नियंत्रण आले. मिठावरील कर आणि निर्बंध मात्र तसेच सुरू राहिले. सुरुवातीस ही कुंपणे बंगाल प्रांतात होती. पुढे सत्ताविस्ताराबरोबर ते वाढत गेले.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर क्रांतीची बीजे रोवली जाऊ लागली. हिंदुस्थानात विविध मार्गाने क्रांतीपर्व सुरू झाले होते. लोकमान्य टिळक जहाल गटाचे नेतृत्व करत होते. ऑगस्ट 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वास प्रारंभ झाला. दक्षिण आफ्रिकेतील आपले कार्य उरकून 9 जानेवारी 1915 रोजी म. गांधी मुंबईस परतले. नामदार गोखले यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी देशातील परिस्थिती वर्षभर पाहिली. म. गांधींनी बिहारमधील चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत 13 जून 1917 रोजी ब्रिटिश सरकारला चौकशी समिती नेमण्यास भाग पाडले. समितीने शेतकऱ्यांकडून खंड कमी घेतला जाईल, वेठबिगारी रद्द होईल व इतर जुलमी प्रकार होणार नाहीत, असे 18 ऑक्टोबर 1917 रोजी जाहीर केले. यानंतर गांधी नेतृत्वाची देशात सुरुवात झाली.
1919 साली रौलट ऍक्टला देशभर असहकारातून विरोध केला. पुढे जालियनवाला बाग हत्याकांड घडले. असहकार आंदोलन थांबले. त्यानंतर गांधीजींनी अस्पृश्यता, व्यसन, गरिबी निर्मूलनावर भर दिला. यातून अहिंसा मार्ग स्वीकारत देशभर आंदोलने उभी राहू लागली. सन 1928 मध्ये ब्रिटिश सरकारने सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमले होते. भारतीय स्वातंत्र्याविषयी कोणतीच योजना यात नव्हती तसेच यात एकही भारतीय सदस्य नसल्याने या समितीला “गो बॅक सायमन’ म्हणत विरोध केला. भारतीय लोकांना सरकार विचारत घेत नसल्याचे गांधीजींच्या लक्षात आले. 1928च्या कलकत्ता येथील कॉंग्रेस अधिवेशनात सार्वभौम दर्जा देण्याच्या मागणीचा ठराव पास केला. ठराव नामंजूर केल्यास पुन्हा स्वराज्यासाठी असहकार चळवळ सुरू करण्याचा सरकारला इशारा दिला. वर्षभर अवधी देऊनही सरकारने निर्णय दिला नाही. अखेर 31 डिसेंबर 1929 मध्ये लाहोर येथील कॉंग्रेस अधिवेशनात भारताचा ध्वज फडकावून हा दिवस कॉंग्रेसने स्वराज्य दिन म्हणून साजरा केला.
सरकार मात्र जुलमी सत्ता गाजवतच होते. त्यात मिठासारखी जीवनावश्यक वस्तू असूनही ब्रिटिश मात्र यावरचा कर कमी करायला तयार नव्हते. अखेर गांधींनी मार्च 1930मध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रहाची घोषणा केली. 12 मार्चला अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून मोजक्या 78 सहकाऱ्यांबरोबर दांडी यात्रा सुरू केली. या यात्रेत सरोजिनी नायडू व इला भट यांचाही सामावेश होता. दांडी यात्रेनिमित्त भारतीय जनतेत स्वातंत्र्याप्रती जनजागृती व लोकसंचयन हे दोन उद्देशही होते. 6 एप्रिलला 390 किमी अंतराचा प्रवास 24 दिवसांत पूर्ण करून यात्रा दांडी या ठिकाणी पोहोचली. या 24 दिवसांत हजारोंच्या संख्येने भारतीय या यात्रेत सहभागी झाले होते. हे देशाचे मीठ असून यावर ब्रिटिश सरकारला कर लावण्याचा अधिकार नाही, अशी गांधींची भूमिका होती. हा सविनय कायदेभंगाचा सत्याग्रह असून सरकारने विरोध केला तरी प्रतिकार करायचा नाही मात्र आपल्या ध्येयापासून आपण हाटायचे नाही हा त्यांचा मंत्र सत्याग्रहींनी मानला. दांडी किनारी 6 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधींनी मूठभर मीठ उचलून कायदेभंग केला. यानंतर देशभरात मिठाचे सत्याग्रह होऊ लागले. हे आंदोलन वर्षभर सुरू राहिले. महाराष्ट्रात मुंबई, मालवण, वडाळा, शिरढोण या ठिकाणीही आंदोलने झाली. यात महिलांनीही मोठा सहभाग घेतला.
शेवटी सरकारने नमते घेत लॉर्ड आयर्विन यांच्या नेतृत्वाखाली गांधींशी वाटाघाटी करण्याचे ठरवले. मार्च 1931 मध्ये गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार ब्रिटिश सरकारने सर्व भारतीय कैद्यांना मुक्त करण्याचे मान्य केले. गरिबांना मीठ तयार करण्यास परवानगी देण्यात आली. अशाप्रकारे मिठासाठी देशभर आंदोलन उभे राहून ब्रिटिशांना नमवण्यात म. गांधी यशस्वी झाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यात या सत्याग्रहाचे तसेच म. गांधी यांचे योगदान मोलाचे ठरले.