माणुसकीचे नाते श्रेष्ठ : अपघाताने मृत्यू पावलेल्या इसमाकडे नातेवाइकांनी फिरवली पाठ
निगडी – रक्ताच्या नात्यांपेक्षा कित्येकपटीने मानवतेची नाती श्रेष्ठ ठरतात याची प्रचिती जीवन जगताना अनेकदा येते. अशीच एक घटना रुपीनगर परिसरात घडली आहे. अपघाताने मृत्यू पावलेल्या इसमाकडे नातेवाइकांनी पाठ फिरविल्याने परिसरातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने अंत्यविधी केला.
रुपीनगर येथील महेश करांडे यांच्या वडीलांचे मागील आठवड्यात निधन झाले. तेव्हा त्यांचा अंत्यविधी व कार्यक्रम उरकून महेश पुण्याला येत होते. त्यांच्या रिक्षाला अपघात झाला, ते जखमी झाले. त्यांना उरुळीकांचन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी काऊंटरला पैसे भरण्यास सांगितले. तेव्हा सख्ख्या भावाने एटीएम मधून पैसे घेऊन येतो, असे सांगून रुग्णालयातून पळ काढला. त्याची वाट पाहिली, परंतु तो पुन्हा माघारी फिरकलाच नाही. उपचार सुरू असतानाच महेश यांचा मृत्यू झाला.
रुपीनगर परिसरातील त्याच्या सर्व मित्रमंडळीनी त्याच्या भावाला, तीन बहिणींना, मामा, मावशी, चुलत भावाला त्याच्या निधनाची बातमी कळवली. बातमी ऐकताच नातेवाईक धावतपळत येतील असे वाटत होते. परंतु सर्वांनी संस्कृती विसरत नात्यांना तिलांजलीच दिली. कोणीही मृतदेह ताब्यात घेण्यास पुढे आले नाही. शेवटी हताश होऊन ही सर्व मित्रमंडळी रुपीनगरमधील मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराचे उपाध्यक्ष विशाल मानकरी यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले. त्यांनीही महेश यांच्या नातेवाइकांना, पाहुणे मंडळींना फोन करुन समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्यास तयार नव्हते.
शेवटी मानकरी व मनसेचे शहर सचिव राहुल जाधव, शहर संघटक सुशांत साळवी, उपविभागाध्यक्ष सचिन मिरपगार, महिला सेना विभागाध्यक्षा सुजाता काटे, अचानक मित्र मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील मुस्लिम बांधव नवाज तांबोळी, अस्लम तांबोळी आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल वाघमारे यांनी सलग दोन दिवस हॉस्पिटल आणि पोलिसांसोबत संपर्क करत पोस्टमार्टम आणि करोना टेस्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री 8.30 ला निगडी स्मशानभूमी येथे त्यांचा अंत्यविधी केला.
रक्ताची नाती ठरली फिकी
रुग्णालयात पैसे भरायचे होते, तेव्हा सख्खा भाऊ निघून गेला. मृत्यू झाल्यानंतरही कुणी अत्यंसंस्कारासाठी पुढे आले नाही. यामुळे रक्ताची नातीही आता फिकी झाली आहेत की काय असे चित्र निर्माण झाले आहे. रक्ताच्या नात्यांपेक्षा माणुसकीचे नाते केव्हाही श्रेष्ठ ठरते. याची प्रचिती या घटनेत आली. सख्खे भाऊ, बहीण असून देखील त्यांनी अंत्यविधी करण्यास नकार दिला. परंतु परिसरातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत अंत्यविधी करण्यास पुढाकार घेतला.