जोर्वे दत्त मंदिरास 250 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध धार्मिक कार्यक्रम
दररोज सुमारे सात हजारांची उपस्थिती
दत्त देवस्थानला 250 वर्षपूर्ती निमित्त 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या या सप्ताहात काकड आरती, भजन, प्रवचन, दिंडी पारायण, हरी कीर्तन असे दिवसभर विविध उपक्रम असतात. सायंकाळी सर्व भाविकांसाठी गावकऱ्यांच्यावतीने सामुदायिक अन्नदान होत असून, दररोज गावासह पंचक्रोशीतून 7 ते 8 हजार भाविकांची उपस्थिती, हे या सप्ताहाचे वैशिष्ट ठरले आहे.
संगमनेर – जोर्वेचे दत्त मंदिर हे गावासह परिसरातील नागरिकांचे श्रध्दास्थान आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या मंदिरास यावर्षी 250 वर्षे पूर्ण होत असून, गावाने एकीने आयोजित केलेले कार्यक्रम कौतुकास्पद असून, समतेची शिकवण देणारा मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
जोर्वे येथील दत्त मंदिरास 250 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक पारायण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजितथोरात उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात म्हणाले, दत्त हे देवस्थान जुने आहे. एकमुखी असलेले हे देवस्थान परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या प्राचीन मंदिराच्या सभामंडपासाठी पंडितराव थोरात यांनी पुढाकार घेतला. दक्षिण भारतातून कारागिर आणले. अत्यंत सुंदर कोरीव काम करुन, सभामंडप उभारला. तालुक्यात इंद्रजितथोरात यांनी कार्यकर्ता म्हणून, मोठी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव सप्ताह संस्मरणीय ठरणार आहे. वारकरी संप्रदायाला अनेक वर्षाची मोठी परंपरा आहे. विविध समाजातील संतांची मोठी मांदियाळी असलेल्या भागवत धर्माने समानता व मानवता ही शिकवण दिली आहे.
आनंदी व शांत जीवन जगण्याचा मार्ग दाखविला आहे. माणसांत देव पाहिला पाहिजे ही शिकवण दिली आहे. अनेक तरुण उच्च शिक्षण घेवून देश विदेशात कार्यरत आहेत. शिक्षणाला अध्यात्माची जोड मिळाल्यास जिवनाचा खरा अर्थ युवकांना कळेल. सध्या धर्माचा उपयोग राजकारणासाठी होत असून, हे वाईट आहे असे सांगून सर्वांनी जिवनात अध्यात्माची सांगड घालावी, म्हणजे मन शांती मिळेल असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी इंद्रजित थोरात म्हणाले, गावाच्या आराध्य दैवत असलेल्या दत्त मंदिराच्या 250 वर्षापूर्ती निमित्ताने श्रध्देतून हा सामुदायिक सोहळा घडत आहे. तरुणांनी व नागरिकांनी एकत्र येणे महिला भगिनींचे पारायण व विविध उपक्रमांचे आयोजन अन्नदान होत आहे. यामध्ये गावाचे सहकार्य मिळत असल्याचे ही ते म्हणाले. समाधान महाराज भोजेकर यांचे हरी कीर्तन झाले. यावेळी हजारो नागरिक व महिला उपस्थित होते. आज महंत रामगिरी महाराज यांचे कीर्तन आज शनिवारी सायं 6 वा. सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, भाविकांनी उपस्थित राहणे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.