पाटणा – दिल्लीत कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाटण्यात आज बिहार मधील महाआघाडीच्यावतीने मानवी साखळी उभारण्यात आली होती. त्याचे नेतृत्व राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केले. महाआघाडीतल्या घटक पक्षांचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
या विषयी पत्रकारांनी आज मुख्यमंत्री नितीशकुमार यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी यावर फार आक्रमक भाष्य करण्याचे टाळले. ते म्हणाले की आम्हीही लोकांच्या महत्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनेक वेळा असे उपक्रम केले आहेत.
राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या धोरणानुसार आंदोलन करण्याचा अधिकार आहे. नितीशकुमार पत्रकारांशी बोलत असताना राजदचे मनोज झा हेही त्यावेळी तेथे उपस्थित होते. ते म्हणाले की नितीशकुमार यांच्या सरकारच्यावेळी ज्या मानवी साखळीचे उपक्रम झाले त्याला प्रशासनाची मदत होती पण आज झालेल्या या उपक्रमाला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
केंद्र सरकारने गाझीपुर आणि सिंघु बॉर्डरवर नाहक आग लावण्याचे काम केले आहे असा आरोपही झा यांनी केला. झा हे राजदचे राज्यसभेचे सदस्य आहेत. पाटण्याखेरीज बिहारच्या अन्य जिल्हा मुख्यालयांमध्येही अशा मानवी साखळी उभारून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.