पाथर्डी -तालुक्यातील केळवंडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सक्षम गणेश आठरे या आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.25) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यापूर्वीही 14 ऑक्टोबर रोजी मढी येथील साळवेवस्तीवरील श्रेया साळवे या चिमुकलीला बिबट्याने भक्ष्य बनविले होते. एकाच आठवड्यात बिबट्याने दोन चिमुरड्यांना भक्ष्य बनवल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पाथर्डी शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याला केळवंडी गाव आहे. माणिकदौंडी घाट उतरल्यानंतर अर्धा किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला आठरे यांची वस्ती आहे. नेहमीप्रमाणे घरासमोरील पडवीत आजोबांबरोबर आठ वर्षांचा सक्षम झोपला होता. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने झोपेत असलेल्या सक्षमवर हल्ला केला. त्यानंतर त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे घरातील इतर सदस्य जागे झाले. मात्र सर्वांसमक्ष बिबट्याने सक्षमच्या पायाला धरून त्याला ओढत नेले. वस्तीपासूनच काही अंतरावर असलेल्या तुरीच्या शेतात बिबट्याने सक्षमच्या शरीराचे लचके तोडले. घटनेची माहिती समजताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी, नातेवाईक व मदतीला आलेल्या ग्रामस्थांना तुरीच्या शेतात सक्षमचा मृतदेह सापडला. ग्रामस्थांना पाहून बिबट्याने डोंगरात धूम ठोकली. सक्षमचा कमरेचा काहीभाग व एक पाय बिबट्याने पूर्ण फस्त केला होता. उप जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर दुपारी सक्षमच्या मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यापूर्वीही शेतकऱ्यांची अनेक जनावरे बिबट्याने फस्त केली आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडे अनेकदा पिंजरे लावण्याची मागणी केली होती. मात्र वनविभागाने ही बाबत गांभीर्याने न घेतल्याने ही वेळ आली, असा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बन्सी आठरे व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिरसाठ यांनी केला.