क्रिकेटच्या सामन्याप्रमाणे लाखोंच्या लाईक्स
चेन्नई – जागतिक बुद्धिबळ महासंघाने प्रथमच घेतलेल्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत भारताने रशियासह संयुक्त विजेतेपद पटकावत इतिहास रचला. त्यातही क्रिकेटच्या एखाद्या सामन्याप्रमाणे बुद्धिबळाला देखील लाखो क्रीडा रसिकांनी प्रचंड पाठिंबा दिला.
बुद्धिबळ क्रीडा क्षेत्रात विश्वविजेतेपद स्पर्धेनंतर सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने रविवारी रशियाच्या बरोबरीने ऐतिहासिक संयुक्त विजेतेपद पटकावले. ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद, जलद प्रकारातील जागतिक विजेती कोनेरु हम्पी अशा अनुभवी खेळाडूंबरोबरच दिव्या देशमुख, प्रज्ञानंद व निहाल सरीन अशा नवोदीत खेळाडूंनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर भारताने हे यश मिळवले. अंतिम लढतीत भारताचा मुकाबला बलाढ्य रशियाशी होता.
पहिला सामना 3-3 असा बरोबरीत सुटल्यामुळे दुसऱ्या सामन्याला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले होते. या स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत अपराजीत राहिलेल्या हम्पीलाही पराभवाचा धक्का बसला. त्याचवेळी दीव्या व निहालला इंटरनेटमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडाने पराभूत व्हावे लागले होते. मात्र, भारताने याबाबत तक्रार केल्यावर त्याची शहानिशा करत महासंघाने भारताला रशियासह संयुक्त विजेते घोषित केले गेले.
भारताचे हे पहिलेच ऑलिम्पियाड विजेतेपद ठरले. यंदा करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा इतिहासात प्रथमच ऑनलाइन पद्धतीने खेळवली गेली. भारतीय संघाची कामगिरी सरस होत गेल्याने
स्पर्धेला सोशल मीडियावरून प्रचंड प्रतिसाद लाभला. क्रीडा रसिकांना या स्पर्धेबद्दल असलेली उत्सूकता दिवसेंदिवस वाढली व अंतिम सामन्यांना लाखो रसिकांनी पाठिंबा दिला व लाईक्स दिल्या. तसेच जेव्हा भारताला संयुक्त विजेते घोषित केले गेले. त्यावेळी लाखोंच्या संख्येने शुभेच्छा संदेश पोस्ट करण्यात आले. क्रिकेटच्या एखाद्या सामन्याला जसा मोठा प्रतिसाद मिळतो तसाच बुद्धिबळालाही मिळाल्याने खेळाडूंनीही आनंद व्यक्त केला.