आळंदी -भाविकांनी वारी झाडाच्या सानिध्यात साजरी करावी. गावातील जुन्या वृक्षास प्रदक्षिणा करावी. त्यास मिठी मारावी. आपल्याला विठ्ठल तिथे भेटेल. तसेच या वर्षीचे पायी वारी दिंडी पालखी सोहळ्याची आठवण म्हणून प्रत्येकाने आपापल्या भागात एकेक वृक्ष लावाव, असे आवाहन अभिनेते तथा वृक्षमित्र सयाजी शिंदे यांनी केले आहे.
वारकरी संप्रदाय, आळंदी, देहू, पंढरपूर देवस्थानांसह सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून संतांचे पालखी मार्ग दुतर्फा आणि पालखी तळांवर वृक्षारोपण, संवर्धन अभियान अंतर्गत हरित वारी चळवळ राबविण्यात येणार आहे. यासाठी रविवार (दि. 21) पासून मार्ग व पालखी तळांची पाहणी नियोजनास प्रारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, याच्या नियोजनासाठी शनिवारी (दि. 20) आळंदीत बैठक पार पडली, त्यावेळी शिंदे बोलत होते.
याप्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, देहू देवस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी मोरे, लेखक अरविंद जगताप, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर, श्रीधर सरनाईक आदींचे उपस्थितीत यासाठी बैठक झाली.
या बैठकीत श्रींच्या पालखी मार्गावर आणि पालखी तळांवर हरित वारी अंतर्गत वृक्षांचेरोपण व वृक्ष संवर्धन अभियान सुरू करण्यात आला आहे. ऍड. विकास ढगे पाटील म्हणाले की, आळंदी देवस्थान वृक्ष संवर्धनास संरक्षक पिंजरे उपलब्ध करून देणार असून वृक्षारोपणास सह्याद्री देवराई संस्थातर्फे वृक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या 12 पालखी तळांवर प्रत्येकी 8 झाडे संताचे नांवे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.