रामायणावर ढिगभर सिरीयल आणि सिनेमेदेखील होऊन गेले आहेत. हिंदीबरोबर तमिळ आणि कन्नडमध्येही रामायणावर सिनेमे होऊन गेले आहेत. पण अजूनही रामायणावर सिनेमा करण्याचा मोह सिनेनिर्मात्यांना आवरत नाही. आता दक्षिणेतील अईलू अरविंद, मधु मंतेना आणि नमित मल्होत्रा या तीन बड्या निर्मात्यांनी मिळून तीन भागांमध्ये या भव्यदिव्य प्रोजेक्टची निर्मिती करायचे ठरवले आहे. वृत्तानुसार, या चित्रपटात श्रीरामाची भूमिका ऋत्विक रोशन करणार आहे तर सीतामातेच्या भूमिकेत दीपिका पदुकोण झळकणार आहे. यासाठी ऋत्विक रोशनने होकारही दिला असल्याचे वृत्त समजत आहे.
‘दंगल’फेम नितेश तिवारी आणि “मॉम’ फेम रवि उदयवर यांच्यावर डायरेक्शनची जबाबदारी असेल. 2021 ला रिलीज होणाऱ्या या सिनेमासाठी हिंदी, तमिळ, तेलगू या तिन्ही फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांना सहभागी करून घेतले जाणार आहे. एवढेच नव्हे तर हे तीन भागातील “3डी’ “रामायण’ चक्क हिंदी, तमिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये असणार आहे. तब्बल 500 कोटी रुपये एवढे प्रचंड बजेट असलेल्या “रामायण’ मध्ये वानरसेना आणि रावणाच्या सेनेतील युद्धाचे प्रसंग दाखवण्यसाठी चक्क हाय एन्ड टेक्नोलॉजी वापरली जाणार आहे. यापेक्षाही मोठा 1000 कोटींचा प्रोजेक्ट “महाभारत’ असणार आहे. त्यात मल्याळममधील बडे कलाकार मोहनलाल हे भीमाचा रोल करणार आहेत. पण “महाभारत’चे आणखी तपशील समोर यायचे आहेत.