रवींद्र कदम
नगर – दैनिक प्रभातने मनपाचा “अग्निशमन विभागच रामभरोसे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अचानक अग्निशमन विभागास भेट दिली असता, अग्निशमन विभागाचे अधीक्षक शंकर मिसाळ हे रजेवर असून, त्यांचा पदभार इतर कुणालाही दिला नसल्याचे उघड झाले. याबाबत अधिक माहिती घेतली असता, धक्कादायक बाब पुढे आली आहे.
अग्निशमन विभागाची धूरा साहेबांच्या मर्जीतील एका बिगाऱ्याकडे तोंडी आदेशाद्वारे दिल्याचे समजले. त्यामुळे हा बिगारीच अग्निशमन विभागाचा अधिकारी झाला असल्याची चर्चा सुरु आहे. फायर अधीक्षक मिसाळ यांच्या तोंडी आदेशान्वे कर्यालयीन कामकाज पाहण्यासाठी, तसेच कर्मचाऱ्यांच्या सुट्या या कर्मचाऱ्यांकडून मंजूर होतात. तसेच त्यांनी सुट्ट्या नाकारल्या, तर कर्मचाऱ्यांना ही सुट्ट्या मिळत नाही. तसेच संबंधित अधिकारी हा आपत्कालीन घटनेत अग्निशमन विभागाच्या वाहनाबरोबर फिरकले नसल्याचे समजले. कर्मचाऱ्यांच्याच भरोशावर सोडला जात आहे.
तसेच या महत्वाच्या विभागात फक्त सहा तांत्रिक कर्मचारी असून, इतर कर्मचारी हे महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांचे आहेत. त्यांना ना कुठली सुविधा आहे ना त्यांचा विमा अग्निशमन विभागाने उतरविला आहे. त्यामुळे त्यांचे जीव धोक्यात घालूनच कामकाज सुरू आहे. तसेच त्यातील अनेक कर्मचारी हे लवकरच सेवानिवृत्त होत असून, त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक कर्मचाऱ्यांचे काम करावे लागत आहे. त्यामुळे शहराची सुरक्षा लांबच राहिली असून, त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे आयुक्तांनीही या विभागाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
शिर्डी, राहुरी, संगमनेर, पाथर्डी, एमआयडीसी यांच्याकडे वाहने असून, अनेक पदे मंजूर आहेत. मात्र नगर शहरासारख्या मोठ्या शहरात फक्त एक वाहन असून, त्यातही कर्मचारी संख्या अपुरी आहे. नगर शहरासह सावेडी, केडगाव या उपनगरांचा विस्तार वाढत असल्यामुळे अग्निशमन विभागाने माळीवाडा, सावेडी यानंतर केडगाव येथेही आपले केंद्र सुरू केले होते. परंतु, अपुऱ्या मनुष्यबळामुळे दोन्ही केंद्र बंद आहे. त्यामुळे केवळ सावेडी परिसर हा दूरधंवनी उचलण्यापुरताच राहिले आहे. अग्निशमन विभागाचे प्रत्येकी चार हजार लिटरचे दोन अग्निशमन बंब आहेत.
यापैकी एक बंब हा सावेडी येथील केंद्रात, तर एक बंब माळीवाडा येथील केंद्रामध्ये असतो. परंतु, यामधील एक बंब गेल्या महिन्याभरापासून नादुरुस्त आहे. त्यामुळे सध्या माळीवाडा येथील केंद्रावरच अग्निशमन विभागाचा बंब दिसतोय. याशिवाय या विभागाकडे दोन जीप असल्या, तरी त्यांची क्षमता कमी आहे. यामध्ये प्रत्येकी अवघे 250 लिटर पाणी बसते. त्यामुळे मोठी आगीची दुर्घटना घडल्यास नागरिकांनाच त्याचा फटका बसतो. शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांहून अधीक असून, नियमानुसार 50 हजार लोकसंख्येमागे एक मोठे अग्निशमन वाहनाची आवश्यकता आहे. त्यामुळे नगर शहरात नियमानुसार सात मोठी वाहने आवश्यक असून, प्रत्येक वाहनावर 21 कर्मचाऱ्यांची अवश्यकता आहे. त्यानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागात 147 कर्मचारी असावेत.
शासनाने दुर्लक्षित केलेली महापालिका : बोराटे
अहमदनगर महापालिका ही शासनाने दुर्लक्षित केली आहे. त्यामुळे महापालिकेला सहा महिन्यांपासून पूर्णवेळ आयुक्त मिळेना. अग्निशमन विभागाला वाहने मिळेनात. कर्मचारी संख्या आपुरी, तसेच महापौर हे फक्त नावालाच राहिले आहेत. पालिकेचा भोंगळ कारभार सुरू आहे. कर वसुलीच्या नावाखाली मात्र नगरकरांची लूट सुरु आहे असे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले.