लोकसभा निवडणुकीत एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. आता सर्वांना नरेंद्र मोदींचा शपथविधी आणि त्यांचे मंत्रीमंडळ कसे असेल? याची उस्तुकता आहे. तर नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राचे किती मंत्री असतील? कोणा-कोणाला केंद्री मंत्रीपद मिळेल याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
तसेच मंत्रीमंडळ निवडताना महाराष्ट्रातून कोणाची निवड होते? हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. कारण महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मंत्र्यांची निवड करताना काही जातीय समीकरणे लक्षात घेतली जाणार का? याचीदेखील चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्रातून नितीन गडकरी, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर आणि पियुष गोयल यांनी मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळात प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदाही त्यांची नावे परत दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात समावेश होता. परंतु अवघ्या दीड वर्षानंतर दानवेंना परत राज्यात पाठवले गेले. आता दानवेंना पुन्हा दिल्लीमध्ये पाठवले जाणार का? याचीही उत्सुकता आहे.
तसेच महाराष्ट्रामधून सुभाष भामरे आणि हंसराज अहिर हे दोन राज्यमंत्री होते. परंतु अहिर यांचा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे अहिर यांच्या जागेवर कोणत्या नव्या चेहऱ्याची वर्णी लागणार? धनगर समाजाचा मागील काही काळापासून सरकारवर विशेष रोष आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी यावेळी विकास महात्मे यांचा विचार होणार का? याकडेही लक्ष असेल.
तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला पाय रोवायचे असतील तर तिथेही ताकद देण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगलीला भाजपच्या बालेकिल्ल्यात परावर्तित करणाऱ्या संजयकाका पाटील यांना मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे.