नवी दिल्ली – एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा सन्सने लावलेली 18 हजार कोटी रुपयाची बोली सरकारने स्वीकारली आहे. आता एअर इंडिया पुन्हा मूळ मालकांच्या ताब्यात जाणार आहे. 1932 मध्ये टाटा समुहाने एअर इंडिया 2 लाख रुपयाच्या भांडवलाने सुरू केली होती.
टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा म्हणाले की, भरपूर प्रयत्न करून कंपनीला गतवैभव प्राप्त करुन देऊ. जर जेआरडी टाटा आता हयात असते तर त्यांना कमालीचा आनंद झाला असता, असे त्यानी सांगितले.
एअर इंडियाच्या खरेदीसाठी चार निविदा आल्या होत्या. यासाठी किमान बालेलीची रक्कम 12,906 कोटी रुपये होती. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली निर्गुतवणुकीसाठी स्थापन केलेल्या सचिवस्तरीय समितीकडून तपासणीही पूर्ण करण्यात आल्यानंतर टाटांची निवड करण्यात आली.
या खरेदीचा टाटांना फायदा पुढील प्रमाणे होणार आहे. पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे, भावनिक नातं असलेली कंपनी पुन्हा आपल्याकडे आल्याचे समाधान टाटांना मिळेल. एअर इंडियावर १०० टक्के मालकी टाटांची असेल. त्यात एअर इंडिया एक्स्प्रेसचीही मालकी असेल. शिवाय मालवाहतूक आणि ग्राऊंड हँडलिंग करणारी एआयएसएटीएस या कंपनीची ५० टक्के मालकीही मिळेल.
दरम्यान, एअर इंडियाचे 100 टक्के भागभांडवल विकण्याची प्रक्रिया केंद्राने जानेवारी 2020 पासून सुरू केली होती. मात्र करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेस विलंब झाला. नंतर एप्रिल 2021 मध्ये सरकारने उत्सुक कंपन्यांना पुन्हा वित्तीय बोली लावण्यास सांगितले. बोली लावण्यासाठी 15 सप्टेंबर ही अंतिम मुदत दिली गेली होती. एअर इंडियावरील एकूण थकीत कर्ज 60,074 कोटी रुपये आहे. खरेदीदाराकडून यापैकी 23,286 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाचा भार उचलला जाणार आहे. 2007 पासून ही कंपनी तोटयात आहे.
जेआरडी टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाइन्स या नावाने स्थापन केलेल्या या कंपनीचे, पुढे 1946 मध्ये एअर इंडिया असे नामकरण केले गेले. 1948 मध्ये एअर इंडिया इंटरनॅशनलने युरोपसाठी उड्डाणेही सुरू केली. मात्र 1953 मध्ये सरकारने एअर इंडियावर ताबा घेऊन तिचे राष्ट्रीयीकरण केले.