भारतासह संपूर्ण जगाला त्रस्त करणाऱ्या करोना महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवरच आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. खरेतर दरवर्षी एक एप्रिल म्हटलं की ज्याप्रमाणे “एप्रिल फूल’ची आठवण होते त्याचप्रमाणे आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार असल्याची उत्साहजनक भावनाही तयार झालेली असते. पण दिवसेंदिवस करोना महामारीचे संकट अधिकच तीव्र होत असताना नव्या आर्थिक वर्षाबाबत एक संभ्रमावस्था तयार झाली आहे. कसे असणार हे आगामी आर्थिक वर्ष आणि काय दडले आहे या नवीन आर्थिक वर्षात, याबाबत सर्वांच्याच मनात एक कुतुहलाची, भीतीची आणि संभ्रमाची भावना आहे.
गेल्या वर्षी 22 मार्चनंतर जेव्हा देशात करोना महामारी फैलावत होती त्यानंतर आठ दिवसांमध्ये नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ झाला होता. पण तोपर्यंत लॉकडाऊन किंवा इतर तत्सम शब्द लोकांना फारसे माहीत झाले नव्हते. 1 एप्रिल 2020 रोजी सुरू झालेल्या आर्थिक वर्षाचे पहिले तीन महिने संपल्यानंतर या महामारीच्या संकटाचे चटके जाणवू लागले. नंतर संपूर्ण आर्थिक वर्ष विस्कळीत झाले आणि काही प्रमाणात वाया गेले. आता नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असताना पुन्हा एकदा देशात आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील अनुभव पाहता जर पुन्हा एकदा लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली तर समाजातील आणि आर्थिक व्यवस्थेतील सर्वच घटकांची कंबर मोडणार, यात कोणतीही शंका नाही. मुळात गेल्या आर्थिक वर्षामध्ये सरकारने सर्वच बाबतीत मुदतवाढ दिली होती. आयकर रिटर्न भरणे असो, जीएसटी रिटर्न भरणे असो किंवा इतर अनेक आर्थिक व्यवहार असोत सर्व व्यवहारांच्या अंतिम मुदत संपल्या असल्या तरी सरकारने सर्व लोकांना वाढीव मुदत दिली होती. त्याचा मोठ्या प्रमाणावर ताण व्यवस्थेवर पडला आहे.
संपूर्ण आर्थिक व्यवस्था त्यामुळे विस्कळीत झाली आहे. आर्थिक वर्षामध्ये ही व्यवस्था पुन्हा मार्गावर आणण्यासाठी उत्साहाने काम करण्याची गरज असतानाच पुन्हा एकदा जर लॉकडाऊन लागले तर ही व्यवस्था अधिकच विस्कळीत होण्याचा धोका लक्षात घ्यायला हवा. नवे आर्थिक वर्ष म्हणजे, समाजातील आणि अर्थव्यवस्थेतील सर्वच घटक नव्याने नियोजन करत असतात. नवी टार्गेट आणि उद्दिष्टे तयार करून ती वर्षभरात पूर्ण करण्यासाठी नियोजन केले जाते. या सर्व उद्दिष्टांना आणि नियोजनाला करोनाच्या संकटाची झालर आहे.
गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली रोजगार कपात एकीकडे आणि दुसरीकडे वर्क फ्रॉम होमची रुजलेली संस्कृती, याचा समतोल साधत समाजातील सर्वच घटकांना आगामी आर्थिक वर्षात काम करावे लागणार आहे. गेल्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये करोनाविषयक निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आली असली तरी अद्यापही अर्थव्यवस्था संपूर्णपणे सावरलेली नाही हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय न निवडताही महामारीच्या संकटावर नियंत्रण कसे ठेवायचे यासाठी काही विशेष विचार सरकारला करावा लागणार आहे. लोकांच्या निष्काळजीपणामुळे आणि दुर्लक्षामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा महामारीची तीव्रता वाढली आहे हे विसरता येणार नाही.
सध्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये जेव्हा अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली होती तेव्हा लोक सर्वच नियम विसरले होते. त्यातच लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिक अधिकच बेसावध आणि निष्काळजी झाले. त्याचा फटका आता बसू लागला आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षाप्रमाणे हे आगामी आर्थिक वर्षसुद्धा जर वाया गेले तर ते कोणालाच परवडणार नाही हे लक्षात घेऊनच आता सरकारसकट सर्वांना नियोजन करावे लागणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पर्यटन आणि इतर उद्योगांना बऱ्यापैकी सुरुवात होत असतानाच त्यामुळे सर्वच अनुषंगिक उद्योगांना चालना मिळत असतानाच पुन्हा हे जर सर्व बंद झाले तर अर्थव्यवस्था पुन्हा एकदा स्तब्ध होऊ शकते. म्हणूनच नव्या आर्थिक वर्षामध्ये जरी या महामारीचे संकट कायम राहिले तरी लॉकडाऊन असणार नाही याची काळजी सरकारला घ्यावी लागेल.
लॉकडाऊन टाळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनाही आपली जबाबदारी ओळखावी लागणार आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये दीर्घकाळ लॉकडाऊनच्या निमित्ताने घरी बसणाऱ्या समाजातील सर्वच घटकांना आता पुन्हा एकदा तो अनुभव घ्यायचा नसेल तर आपली जबाबदारी ओळखूनच सामाजिक व्यवहार करावे लागणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षामध्ये जर समाजातील सर्वच घटकांना प्रोत्साहन द्यायचे असेल आणि काहीतरी नवे करून दाखवायची उमेद हवी असेल तर प्रत्येकाने आपापल्या पातळीवरच महामारीशी लढावे लागणार आहे. सरकारी पातळीवर विकासाचा दर वाढवण्याचे मोठे आव्हान सरकारला पेलावे लागणार आहे आणि हा विकासाचा दर जर वाढायचा असेल तर अर्थव्यवस्थेतील सर्वच घटकांना चालना द्यावी लागणार आहे. उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या क्षेत्रांना चालना देण्यात आली तरच अर्थव्यवस्थेचा वेग वाढणार आहे पण ही क्षेत्रे करोना महामारीमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये अडकली तर सारे काही ठप्प होणार आहे.
साहजिकच आजपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात सर्व काही सुरळीत चालू राहील याची दक्षता घेण्याचे आव्हान सरकारला पेलावे लागणार आहे. एकीकडे करोना महामारीच्या संकटावर नियंत्रण ठेवणे आणि दुसरीकडे लॉकडाऊन न ठेवता विकासाला चालना देणे या गोष्टी सरकारला कराव्याच लागतील. त्यामध्ये संपूर्ण यश आले तरच आजपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाबाबत काही आशादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजातील सर्वच घटकांनी आपापली जबाबदारी ओळखून योग्य सहकार्य केले तरच हे आगामी आर्थिक वर्ष आनंदाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ शकते, हे विसरून चालणार नाही.