पुणे – महादेव जाधव- स्मार्ट शहरांच्या यादीत पुणे शहर दुसऱ्या क्रमांकाने विकास करण्यासाठी निवडण्यात आले होते. परंतु, नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 11 गावांतच मूलभूत नागरी सुविधांचा पुरता फज्जा उडालेला असताना खरंच आपले शहर स्मार्ट होणार का? असा सवाल पालिकेत समावेश करण्यात आलेल्या गावांतून केला जात आहे.
शहराचा विस्तार करताना लगतच्या उपनगरांना सोयीसुविधा मिळाव्यात या उद्देशाने उंड्री,फुरसुंगी व ऊरुळी देवाची यासह अन्य गावांचा समावेश गेल्या चार वर्षांत पालिकेत करण्यात आला. याच दरम्यान स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेने पुणे शहराची आगेकुच असताना समाविष्ट गावांत मात्र वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधा पुरवण्यातही पालिकेला अपयश आले आहे.
पालिकेत समावेशानंतर या गावांना महत्त्व प्राप्त झाल्यानंतर गावात मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहू लागले आहेत. या गावांना आता उपनगरांचे रूप आले आहे. परंतु, वरवर रंगरंगोटी झालेल्या या गावांचा मूलभूत विकास मात्र तसाचा राहिला आहे. आजही
अनेक सोसायट्यांना पिण्याचे पाणी टॅंकरने मागवावे लागत आहे. केवळ पाण्यासाठी महिन्याला एक ते दिड लाख रुपये खर्च करावा लागत आहे. अनेक भागात सांडपाणी वाहिन्यांची व्यवस्थाच केलेली नाही. पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या एकाही गावातील रस्त्यावर गेल्या चार वर्षात डांबर पडलेले नाही. यामुळे रस्त्यांचे मोठी दुरवस्था झाली आहे. शहरातील शेकडो टन कचरा उचलून उरूळी देवाची सारख्या गावात टाकला जात असताना पालिकेत समावेश करण्यात आलेल्या गावांसाठी स्वतंत्र कचरा सफाई यंत्रणा अद्यापही कागदावरच आहे.
विशेष म्हणजे पालिकेत समावेश झालेल्या गावांना स्थानिक प्रतिनिधीच नसल्याने नागरिकांना प्रशासनावर अवलंबून रहावे लागत आहे. या गावांतून कोट्यवधींचा कर गोळा होत असताना विकासकामांवर मात्र काहीही खर्च केला जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. समस्यांचा बागलबुवा आणि विकासाचे गाजर दाखवून ज्या गावांचा समावेश पालिकेत करण्यात आला, तीच गावातील समस्या जटील झाल्या आहेत.
समाविष्ट गावातील लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रया…
पालिकेने समाविष्ट 11 गावांचा विकास आराखडा तयार करुन तत्काळ मंजुर केल्यास सुनियोजित विकास करता येईल.
– गणेश ढोरे, नगरसेवक (समाविष्ट 11 गावं)
गावातील डेव्हलपमेंट प्लॅन मधील रस्ते ताब्यात घेऊन नवीन डीपी प्लॅन त्वरित तयार करावा. अरुंद खराबरस्ते, सांडपाणी व्यवस्थेचा अभाव आहे. – उल्हास शेवाळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख
गावे समाविष्ट होऊन दोन वर्ष होऊनही पालिकेच्या पुरेशा निधीअभावी याभागाची दुरवस्था झाली आहे. अकरा गावांसाठी पालिकेने विशेष निधीची तरतूद करणे गरजेचे आहे.
– सचिन घुले, उपसभापती, पं.स.हवेली, माजी उपसरपंच, ऊंड्री
समाविष्ट भागात मोठमोठे गृहप्रकल्प झाले असून त्यातील ऍमिनिटी स्पेसच्या अनेक जागा शिल्लक आहेत. या जागा पालिकेने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी समाजपयोगी प्रकल्प राबवावेत.
– नागेश हरपळे, सामाजिक कार्यकर्ते,फुरसुंगी
पालिका असून नसल्यासारखे वाटते. त्यामुळे पालिकेपेक्षा आमची ग्रामपंचायतच बरी होती, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
– निवृत्ती बांदल, सरपंच, उंड्री