देवयानी देशपांडे
ज्यांना अनेक नवनवीन संधी खुणावत आहेत असे विशीतले तरुण एखाद्या परीक्षेत अपयश आले म्हणून किंवा नैराश्य आले म्हणून स्वतःचे आयुष्य संपवण्याच्या निर्णयाप्रत येतात ही बाब उद्विग्न करणारी आहे. याची कारणमीमांसा होणे ही काळाची आणि पर्यायाने समाजाचीही गरज आहे. याचे उत्तर मानव्यशास्त्रांमध्ये सापडते का ते पाहूयात.
भारतासारख्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही कायमच चिंतेची बाब राहिली आहे. तसेच दहावी, बारावी आणि स्पर्धापरीक्षा देणारे विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचेही चित्र आहे. फ्रेंच समाजशास्त्रज्ञ एमिल दरखीम यांनी आत्महत्येचा सिद्धान्त मांडला होता. दरखीम यांच्या जिवलग मित्राने आत्महत्या केली म्हणून ते आत्महत्यांचा अभ्यास करण्यास प्रवृत्त झाले असावेत. परंतु, याला इतरही अनेक कंगोरे आहेत. दरखीम यांचा समाजशास्त्राचा अभ्यास सामाजिक वास्तववादावर आधारलेला होता. त्यांच्या मते समाज ही काल्पनिक बाब नाही. ती एक वस्तुस्थिती आहे. सामाजिक वास्तवाची यथार्थता सिद्ध करण्यासाठीच दरखीम यांनी आत्महत्येचे अध्ययन करायचे ठरवले.
दरखीम यांच्या काळात युरोपीय समाजात आत्महत्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. आत्महत्या ही चिंतेची आणि म्हणूनच अध्ययनाची बाब ठरली होती. त्याकाळी युरोपीय समाज संक्रमणावस्थेतून जात होता. तेव्हा अनेक विचारवंतांनी आत्महत्येची अनेक कारणे नमूद केली. व्यवसायामध्ये परिवर्तन, धर्माचा कमी होत जाणारा प्रभाव अशा अनेक कारणांचा त्यात समावेश होता. दरखीम यांच्या मते, समाजाला एकत्रित ठेवणाऱ्या शक्ती जेव्हा क्षीण होतात तेव्हा आत्महत्यांसारख्या समस्या उद्भवतात. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी हा अभ्यास करण्याचे ठरवले आणि त्यासाठी सिद्धान्त मांडला.
आत्महत्या म्हणजे काय?
दरखीम यांच्या मते, “व्यक्तीच्या सकारात्मक अथवा नकारात्मक कृतीची परिणती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यक्तीच्या मृत्यूत होत असेल तर असा मृत्यू म्हणजे आत्महत्या होय.’ ही व्याख्या वाचली की एक बाब आपल्या ध्यानात येईल, दरखीम यांनी या व्याख्येत मानसशास्त्रीय घटकांचा उल्लेख केला नाही. नैराश्यासारखे कोणतेही घटक त्यांनी नमूद केले नाही. याचे कारण असे की त्यांना आत्महत्येचा समाजशास्त्रीय बाजूने अभ्यास करावयाचा होता. आत्महत्येमागे मानसिक कारण नसतेच असे प्रतिपादन दरखीम यांनी केले नाही. परंतु, मानसशास्त्रीय घटकांना निर्णायक महत्त्व देणे त्यांनी नाकारले.
आत्महत्येचे प्रकार
दरखीम यांनी आत्महत्येचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले. म्हणजेच, त्यांच्या मते, आत्महत्येची तीन कारणे होती. आत्मकेंद्रितता (सांघिक उद्दिष्टांवरील निष्ठेचा अभाव), परहितकेंद्रितता (सांघिक निष्ठेची अत्याधिकता) आणि प्रमाणकशून्यता ही ती कारणे होत. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर, एखादी व्यक्ती समाजाप्रती अधिक निष्ठा बाळगत असेल किंवा समाजापासून अलिप्त असेल तर अशा दोन्ही परिस्थिती आत्महत्येस कारणीभूत ठरतात. याव्यतिरिक्त समाजातील अनागोंदी हे आत्महत्येचे तिसरे कारण होय.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
आजच्या आत्महत्यांच्या संदर्भात दरखीम यांचा सिद्धान्त कालबाह्य झाला आहे, असा अनेकांचा युक्तिवाद आहे. परंतु, तरीही आजच्या आत्महत्यांचे समाजशास्त्रीय आणि इतर मानव्यशास्त्रांच्या दृष्टिकोनातून विश्लेषण होणे आवश्यक आहे हे नाकारता येणार नाही. मग असे विश्लेषण करण्यासाठी अभिजात सिद्धान्ताचा आधार घेणे अनुचित आहे, असे म्हणता येणार नाही. दरखीम यांचा सिद्धान्त विशिष्ट काळाची निर्मिती आहे, सिद्धान्ताचा भर एका विशिष्ट समाजावर आहे हे खरे असले तरीही आत्महत्येसारख्या उद्विग्न करणाऱ्या घटनांचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठीचे सूत्र या सिद्धान्तात नक्कीच सापडेल.
विशेषतः दहावी, बारावीचे विद्यार्थी आणि स्पर्धापरीक्षा देणारे आणि अधिकारी बनण्याचे स्वप्न उरी बाळगणारे तरुण आत्महत्या करतात तेव्हा त्या कृतीच्या मूळ कारणाप्रत जाणे ही समाजाचा एक भाग म्हणून तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. असे करताना शिक्षण, शिक्षणसंस्था, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारी केंद्रे, स्थलांतर, स्वप्नरंजन, स्व-ओळखीचा अभाव अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात.
दहावी, बारावी परीक्षेत चांगले गुण मिळावे ही अपेक्षा बाळगणारे आणि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणारी तरुण-तरुणी आवश्यक शिक्षण घेण्यासाठी शहरात येतात तेव्हा अधिकारी म्हणून सेवेत रुजू होणे कोणालाही शक्य आहे असे त्यांच्या मनावर बिंबवले जाते. त्या अनुषंगाने, स्वतःची क्षमता ताडून पाहण्याचे संस्कार मात्र त्यांच्यावर केले जात नाहीत. हे मार्गदर्शन खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना मृगजळामागे जाण्याचे मार्गदर्शन होय, असेच म्हणावे लागेल.
स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण होण्याची एखाद्याची क्षमता नसेल तरीही क्षमता आहे असे मानून हे विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्नरंजन करत राहतात. वास्तविक या विद्यार्थ्यांमधून अधिकारी नव्हे परंतु, जागतिक दर्जाचा कलाकार, खेळाडू घडणार असेल तर एक समाज म्हणून आपण त्यास मुकतो आहोत ही बाबदेखील विचार करण्यासारखी आहे. मात्र, स्पर्धापरीक्षा हेच सर्वस्व मानले तर परीक्षेचा अभ्यास करताना “स्व-शोध’ घ्यावयाची प्रक्रिया विद्यार्थ्यांना अनुभवता येईल का? यावर एक समाज म्हणून आपणा सर्वांचे चिंतन होणे प्राप्त आहे.