रिक्षा चालकांना शिस्त लावण्याची गरज
आरटीओ म्हणते “मागील 6 महिन्यांत फक्त 54 घटना’
पुणे – रिक्षाचालकांनी भाडे नाकारण्याचा प्रकार पुणेकरांसाठी सवयीचा झाला आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या या वृत्तीवर आरटीओचे नियंत्रण नसून, कठोर भूमिका किंवा कारवाई ही दूरचीच गोष्ट आहे. भाडे नाकारण्याच्या दिवसाला शेकडो घटना घडूनही 6 महिन्यांत कार्यालयाच्या निदर्शनास केवळ 54 घटना आल्याचे चित्र आहे. शहरातील रिक्षांची संख्या सुमारे 60 ते 70 हजार आहे. तर रिक्षाचालकांच्या अरेरावी ते मारहाणीपर्यंत घटना वारंवार घडतात. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान फक्त 471 रिक्षांची तपासणी केली आहे.
रिक्षाचा वापर नाईलाजास्तव
सार्वजनिक असलेली पीएमपी बसची सेवा सध्या बिकट परिस्थितीत असल्याने नाईलाजास्तव खासगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागतो. बसेसची अपुरी संख्या, अनियमित वेळापत्रक, वाहतूक कोंडी आदीचा विचार करता रिक्षा किंवा कॅबचा पर्याय स्वीकारत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
उपनगरांमध्ये तर मनमानीचे प्रमाण जास्त
शहराच्या उपनगरांमध्ये रिक्षाचालकांच्या मनमानीचे परिणाम जास्त आहे. मुख्यत्वे मध्यवर्ती भागांतून उपनगरांमध्ये जाताना “परतीचे भाडे मिळत नाही’ असे उत्तर रिक्षाचालक देतात. तसेच कमी अंतरासाठी जादा भाडे आकारले जाते.
“त्रासिक’ हावभाव थांबवा
इच्छितस्थळी जाण्याबाबत नागरिकांनी विचारणा केल्यास, रिक्षाचालक “त्रासिक’ नजरेने पाहत असल्याचे नागरिक सांगतात. कोणतेही उत्तर न देता केवळ “त्रासिक’ हावभाव रिक्षाचालकांच्या चेहऱ्यावर असतात.
ज्येष्ठ नागरिकांना तर अधिकच त्रास
रिक्षा चालक ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष करत भाडे नाकारतात. थकलेले आणि वयोवृद्ध नागरिकांची अडचण पाहून रिक्षाचालकांची मुजोरगिरी अधिकच वाढत असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. अनेकदा ज्येष्ठ नागरिक रिक्षा थांबवण्यासाठी रिक्षामागे पळतात. मात्र, रिक्षाचालक वयाची पर्वादेखील न करता निघून जातात.
प्रवासी आणि विद्यार्थ्यांची “लुट’च
बाहेरगावाहून शहरात आलेले प्रवासी आणि विद्यार्थ्यांची रिक्षाचालकांकडून सर्रास “लुट’च होते. शहरातील माहिती नसल्याचे पाहत रिक्षाचालक वाटेल ते भाडे आकारतात. स्वारगेट, शिवाजीनगर, वाकडेवाडी, पुणे स्टेशन या परिसरात नागरिकांना याचा सर्वाधिक मनस्ताप होतो.
कमी अंतरासाठी थेट “जाणार नाही’
रिक्षाचालक सहजपणे भाडे नाकारतात. या मनमानीचा प्रत्यय कमी अंतर असताना येतो. कमी अंतरासाठी जायचे असल्यास रिक्षाचालक थेट “येत नाही’ असे सांगतात. प्रवाशांनी भाडे नाकारण्याचे कारण विचारल्यास रिक्षाचालक उद्धटपणे उत्तरे देत अरेरावी करतात. अनेकदा रिक्षाचालकांनी प्रवाशांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना याचा भुर्दंड बसतो.
“नागरिकांनी तक्रार केल्यास संबंधित रिक्षाचालकाला नोटीस पाठवण्यात येते. त्यानंतर सुनावणी होऊन कारवाई करण्यात येते. भाडे आकारणाऱ्या रिक्षा चालकाला 500 रुपयांचा दंड आकारण्यात येतो.
– अश्विनी स्वामी, सहायक परिवहन अधिकारी.