वनविभाग चिंतेत : ठोस प्रतिबंधात्मक उपाय मिळेना
पुणे – जिल्ह्यातील बिबट्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. हे मृत्यू रोखायचे कसे? असा प्रश्न वनविभागाला सतावत आहे. या समस्येवर अजून तरी कोणताही ठोस प्रतिबंधात्मक उपाय मिळाला नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, वनविभागाने महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधून याबाबत काही उपाय करता येईल, यासाठी चर्चा करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विविध भागांमध्ये प्रामुख्याने महामार्गावर वाहनांच्या धडकेत जखमी होऊन मृत्यू होणाऱ्या बिबट्यांची संख्या लक्षणीय आहे. या घटनांमध्ये होणारी वाढ वनविभाग आणि वन्यजीव अभ्यासक यांच्यामध्ये चिंतेचा विषय बनत आहे.
याबाबत पुणे वनविभागाच्या उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी म्हणाल्या, “वाहनाच्या धडकेमुळे बिबट्याच्या मृत्यू होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. ही खरोखरच चिंतेची बाब आहे. वनविभाग महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधून याबाबत काही करता येईल का यासाठी प्रयत्न करणार आहे. महामार्ग प्राधिकरणाने महार्गाच्या दोन्ही बाजूला “बिबट्याप्रवण क्षेत्र’ असे सूचना फलक लावावे यासाठी विनंती करणार आहे. यामुळे जनजागृती होण्यास थोडीतरी मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.’