राजगुरूनगर आगारात स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिक ताटकळले
राजगुरूनगर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एस.टी) महामंडळाकडून अर्ध्या तिकट दराच्या सवलती घेणाऱ्या ज्येष्ठांना एसटीचे स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी राजगुरुनगर आगारात पहाटे पाच वाजल्यापासून रागेंत ताटकळत बसावे लागत आहे. जादा कर्मचारी नेमण्याची मागणी करूनही यात महामंडळाचे अधिकारी लक्ष घालत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. महामंडळाची वेबसाईट कधी बंद असते तर कधी सर्व्हर डाऊन होत आल्याने दिवसाला केवळ 20 ते 50 कार्ड तयार होतात. बुधवार (दि. 5) पासून राजगुरुनगर बसस्थानकावरुन स्मार्ट कार्ड वितरण सेवा सुरू केली असून आतापर्यंत सुमारे 700 ज्येष्ठ नागरीकांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे.
दिवसभर नंबर नाही आला तर पुन्हा दुसऱ्या दिवशी ते सकाळी पासून रांगेत लागतात. यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचे आधार लिंकिंगला असलेले हाताच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने स्मार्ट कार्ड लिंक होत नाही. त्यामुळे दिवसभर ताटकळलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यातून स्मार्ट काढणाऱ्या कर्मचाऱ्यांशी वाद होत आहेत. ही योजना सुरु झाल्यापासून राजगुरूनगर आगारात ज्येष्ठ नागरिकांची गर्दी असल्याने सुविधा वाढविण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या या मागणीकडे महामंडळाचे दुर्लक्ष आहे.
सध्या, तालुक्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत.
विद्यार्थी पास काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे असे असताना याच खिडकीवर ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड काढले जात असल्याने गर्दी उसळली आहे. ज्येष्ठ नागरिकांची एक रांग व विद्यार्थ्यांची एक रांग केली जाते. उभे राहण्यासाठी येथील जागा अपूर्ण पडत आहे. राजगुरुनगर येथील एसटी आगर खेड आणि आंबेगाव तालुक्यातील बस वाहतूक सेवा करते. मात्र, आगारात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड, तिकीट बुकिंग करताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आला आहे. मात्र, तुटपुंज्या यंत्रणेमुळे संपुर्ण दिवसभर स्मार्ट कार्ड काढण्यसाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.