आजकाल दर दहा व्यक्तीमागे एकाला मुतखड्याचा त्रास असतोच. मुतखडा म्हणजेच किडनी स्टोनची समस्या भारतात खूप सामान्य आहे, ही समस्या 25-45 वर्षे वयोगटात सर्वाधिक दिसून आली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हा धोका तिप्पट आहे. भारतात दरवर्षी सुमारे 5 ते 7 दशलक्ष (50-70 लाख) लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. किडनी स्टोन म्हणजे किडनीमध्ये खनिजे आणि क्षारांनी बनलेले स्फटिक जमा होणे.
ह्या स्थितीमुळे तीव्र वेदना होतात, काही लोकांना लघवीची समस्या देखील असते. त्याची लक्षणे वेळीच ओळखून, स्टोन काढून टाकण्यासाठी उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. जे कमी पाणी पितात, मुतखड्याचा कौटुंबिक इतिहास आहे किंवा जास्त मीठ आणि साखर खातात त्यांना किडनी स्टोन होण्याचा धोका जास्त असतो. आहाराकडे लक्ष देण्यासोबतच पुरेसं पाणी प्यायल्यास ही समस्या टाळता येऊ शकते, असं सर्वच डॉक्टरांचं म्हणणं आहे. किडनी स्टोनची समस्या कोणालाही होऊ शकते. एकदा उपचार केल्यानंतर, पुनरावृत्ती होण्याचा धोका असतो, म्हणून प्रतिबंधात्मक उपायांची नेहमी काळजी घेतली पाहिजे. सुरुवातीला, स्टोन वाढेपर्यंत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
काहीवेळा ते मूत्र प्रणालीमध्ये अडकू शकते ज्यामुळे तीव्र वेदना होतात. किडनी स्टोनच्या बाबतीत, वेदना सहसा ओटीपोटाच्या एका बाजूला किंवा पाठीवर कायम राहते. त्याची वेळीच ओळख करून उपचार करणे आवश्यक आहे.
किडनीमध्ये स्टोन तयार होण्याची समस्या खूप त्रासदायक असते. त्याच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन स्टोन वाढण्यापासून रोखता येऊ शकतात.
1. पाठीच्या खालच्या भागात किंवा पोटाच्या एका भागात वेदना जाणवणे.
2. वेदनासह मळमळ किंवा उलट्या.
3. लघवीमध्ये रक्त येणे किंवा लघवी करताना वेदना होणे.
4. लघवी करण्यास असमर्थ असणे.
5. जास्त वेळा लघवी करण्याची गरज भासते.
6. ताप किंवा थंडी वाजून येणे.
7. लघवीचा वास किंवा फेसाळ दिसणे.