मुंबई – महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन टॅपिंग झाले होते. हे टॅपिंग रश्मी शुक्ला यांनी केले असून जेव्हा हा प्रकार उघड झाला तेव्हा त्यांनी सरकारची माफी मागितली होती. या प्रकरणानंतर ठाकरे सरकारने कंबर कसली असून आपल्या मंत्र्यांना खास सूचना दिल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे सरकारने आपल्या मंत्र्यांना फोन किंवा कॅमेऱ्यासमोर बोलताना भान ठेवावे. तसेच महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी खासगी मोबाईल क्रमांकांचा वापर करावा, असेही मंत्र्यांना सांगण्यात आले आहे.
दरम्यान भाजप सरकारच्या काळात विरोधकांचे फोन टॅपिंग केले जात असल्याच्या आरोपावरून वातावरण तापले होते. फोन टॅपिंगवरून सत्ताधारी आणि भाजपामध्ये तोंड फुटले आहे. भाजप सरकारच्या काळात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे दूरध्वनी टॅप झाल्याबाबतची माहिती गंभीर आहे. सत्तेसाठी भाजप कोणत्याही पातळीला जाऊ शकते. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी सखोल उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, भाजप सत्तेत असताना फोन टॅपिंगचे कुठलेही आदेश दिले नव्हते, असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.