मुंबई – केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला करोनाच्या कठीण परिस्थितीत किती मदत केली हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगायला हवे, असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्र सध्या करोना महामारीच्या मोठ्या संकटात आहे. राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर मोठ्या ताकदीने काम करत असताना राज्यातील विरोधी पक्ष मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याची टीका पटोले यांनी केली.
गेल्या वर्षापासून राज्य करोनासह विविध संकटाचा सामना करत आहे. राज्यात संकटांची मालिकाच सुरू आहे. अशा परिस्थितीतही आघाडी सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी नेहमी तत्पर राहिले आहे. करोनामुळे आर्थिक संकट असतानाही जनतेच्या हितासाठी सरकारने कधीही हात आखडता घेतला नाही. परंतु दुर्दैवाने केंद्रातील मोदी सरकारने नेहमीच महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली.
राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा तसेच इतर निधीही देण्यास टाळाटाळ केली. राज्य संकटात असताना राज्यातील भाजपाचे नेते मात्र आघाडी सरकारविरोधात कटकारस्थाने करत राहीले. कधी राजभवनच्या माध्यमातून, कधी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून षडयंत्र रचण्यातच ते मग्न राहिले.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून देशात बदनामी केली. राज्याला आर्थिक मदतीची गरज असताना मुख्यमंत्री मदतनिधीत पैसे जमा न करता राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान केअर फंडात पैसे जमा केले, अशी टीकाही त्यांनी केली.
मोदींनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले? या 20 लाख कोटी रुपयांतून महाराष्ट्राला किती कोटी मिळाले? याची उत्तरे त्यांनी जनतेला द्यावीत. फडणवीस यांची मागणी रास्तच आहे पण त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे विचारणा करणे अपेक्षित आहे, असे सांगतानाच कदाचित त्यांना दिल्लीत मोदी- शहा गांभीर्याने घेत नाहीत म्हणून ते राज्य सरकारच्या नावावर मोदींना सूचवत असावेत, अशी कोपरखळीही पटोले यांनी लगावली.
सामान्य जनतेला आगीच्या खाईत लोटून देण्याचे पाप भाजपाने केले. लाखो लोकांचे संसार उघड्यावर आले. सामान्य जनतेला किती मरण यातना दिल्या हे जगाने पाहिले. पॅकेजच्या नावाखाली फक्त मोठ्या आकड्यांची जुमलेबाजी केली. देशाला देशोधडीला लावले त्या भाजपला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.