भोपाळ – मध्य प्रदेश विधानसभेच्या आगामी अधिवेशनात लव्ह जिहादच्या विरोधात विधेयक आणले जाण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. दरम्यान याच विषयावर त्या राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी भाष्य केले आहे. त्यानंतर आता राज्य विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यानंतर राज्यात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
देशात सीतेला रूबीया बनविण्याचे कारस्थान सुरू आहे. आणखी किती काळ सीतेला आपल्या देशात अग्निपरिक्षा द्यावी लागेल, असा सवाल शर्मा यांनी उपस्थित केला आहे.
आपला मुदद्दा मांडताना त्यांनी दिग्गज कलाकार सुनील दत्त आणि नर्गिस यांचेही उदाहरण दिले आहे. लव्ह जिहादवाल्यांनी सुनील दत्त आणि नर्गिस यांच्यासारखे खरे प्रेम दाखवावे असे नमूद करतानाचा आपल्या देशात अशा किती नर्गिस आहेत की ज्यांनी सुनील दत्तशी प्रेमविवाह केला आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
लव्ह जिहादच्या संदर्भात कायदा केला जाण्याची गरज आहेच. मात्र तो अतिशय कठोर केला जाण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
शर्मा यांच्या म्हणण्यानुसार मुलींना घाबरवून त्यांचा धर्म बदलला जातो आहे व विवाह लावला जातो आहे. अशा प्रकरणांत संबंधित व्यक्तींवर अपहरण, लूटमार आणि अन्य कलमांखालीही गुन्हा दाखल केला जाण्याची आवश्यकता आहे.
केवळ इतकेच नाही तर संबंधित मुलीला फूस लावण्यासाठी अथवा पळून जाण्यासाठी ज्यांची मदत घेतली जाते अथवा जे मदत करतात त्यांच्यावरही गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले जावेत, अशी मागणी त्यांनी केली.
लव्ह जिहादचे प्रकार रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकार कठोर कायदा करत असल्याची घोषणा गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मंगळवारी केली आहे. या प्रकरणात पाच वर्षे शिक्षेची तरतूद करण्यासोबतच हा अजामीनपात्र गुन्हा केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.