नवी दिल्ली: देशात केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असणारे शेतकऱ्यांचे आंदोलन काही केल्या संपत नाही. शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सातत्याने निषेध करत आहेत. गेल्या 23 दिवसांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर तळ ठोकून असून सरकारकडून कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करीत आहेत. त्याचवेळी कृषी कायद्याच्या विरोधात अनेक शेतकर्यांचे प्राण गमावले आहेत. याच संवेदनशील मुद्द्यावरून आता काँग्रेसचे नेते राहुल गांधीं यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत आहेत. दरम्यान, कृषी कायद्याच्या निषेधावेळी अनेक शेतकर्यांनी आपले प्राणही गमावले आहेत. आता राहुल गांधी यांनीही ट्विटच्या माध्यमातून शेतकर्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला आहे. राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘आणखी किती अन्नदात्यांना बळी द्यावा लागेल? कृषी-विरोधी कायदे कधी रद्द केले जातील?
गेल्या 23 दिवसांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे. यानंतरही त्यांची मागणी सरकारने मान्य करावी यासाठी शेतकरी सातत्याने विरोध करीत आहेत. कृषी कायद्याच्या विरोधात हजारोंच्या संख्येने शेतकर्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढला. दरम्यान आतापर्यंत दिल्ली कूचपासून पंजाबमध्ये 22 शेतकर्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.