परदेशातील जीपीआरएस यंत्रणा कार्यान्वित होणार का : वनक्षेत्रच अनभिज्ञ
रामदास सांगळे
अणे – जुन्नर तालुक्यात असलेल्या बिबट्यांचे किती प्रमाण आहे याचे प्रमाण शोधायचे असेल तर परदेशात वन्यप्राण्यांसाठी जीपीआरएस यंत्रणा बसवतात, तशी यंत्रणा कार्यान्वित केली, तर बिबटे शोधणे आणि त्यांची संख्या किती आहे हे पाहणे, सोपे जाणार आहे.
जुन्नर तालुक्यात बिबट्या पकडून त्याला माणिकडोह निवारा केंद्रात उपचारासाठी नेले जाते. परदेशात पकडलेल्या प्राण्यांसाठी जीपीआरएस यंत्रणा बसवली जाते, असाच प्रयोग जुन्नर तालुक्यात केल्यास बिबट्याचा निश्चित ठावठिकाणा समजण्यास आणि बिबट्यांची संख्या निश्चितपणे कळण्यास मदत होईल. मात्र, या आधुनिक पध्दतीकडे सरकारचे आणि वनविभागाचे लक्ष नाही. त्यांचे काम पारंपरिक पध्दतीनेच सुरू आहे. सरकार आणि वन्य विभागातील तज्ज्ञ आणि या विषयानुषंगिक संशोधकांनी एकत्र येऊन यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जुन्नर तालुक्यातील येडगाव, पिंपळगावजोगा, वडज, माणिकडोह, चिल्हेवाडी या पाच धरणांमुळे जमिनी, जंगले व गावे बुडाली. या पाचही धरणात गेलेली जमीन, जंगल याचा विचार करता जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक निवासस्थानांचा बोजवारा उडाला. तालुक्यातील एक आणि शेजारील तालुक्यातील साखर कारखानदारीमुळे शेतकरी ऊस शेतीकडे वळला, आणि सैरभैर झालेल्या बिबट्यांना मानवनिर्मीत वसतिस्थान तयार झाले.
गेल्या 16 वर्षात हल्ले वाढले
गेल्या सोळा वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे तीन हजार पाळीव आणि इतर जनावरे मृत्युमुखी पडली. सुमारे दोनशे हेक्टर पिकांचे नुकसान झाले आणि आतापर्यंत जवळपास तीस व्यक्तींना प्राणास मुकावे लागले तर शंभरहून अधिक जखमी झाले आहेत.
वनविभागातर्फे नागरिकांच्या मागणीनुसार बिबट्याचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी पिंजरे लावावेत. माणिकडोह बिबट निवारण केंद्रात येणाऱ्या बिबट्यांची नियमित गणना करण्यात यावी. जुन्नर तालुक्यातील एकूण बिबट्यांची संख्या अद्याप उपलब्ध नाही.
अतुल बेनके,आमदार, जुन्नर
गेल्या वर्षी शाळेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख व नारायणगावच्या वनपरिमंडल अधिकारी मनीषा काळे यांनी विद्यार्थांना बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत मार्गदर्शन केले होते. अशा प्रकारे तालुक्यात नियमित जनजागृती होणं गरजेचं आहे.
विद्या गाडगे,मुख्याध्यापिका मॉडर्न स्कूल, बेल्हे
2018-19 मध्ये ओतूर परिक्षेत्रातून 104 पशूंवर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. या पशुधन मालकांना 6 लाख 24 हजार रुपयांची मदत केली आहे, तसेच 5 व्यक्तींवर बिबट्याने हल्ला केला आहे. पैकी 3 व्यक्तींना आर्थिक मदत वनखात्याकडून देण्यात आली आहे. मदतीसाठी अवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे
गरजेचे आहे.
योगेश घोडके,वनपरिक्षेत्र अधिकारी ,ओतूर
तालुक्यात बिबट्यांना पकडण्यासाठी जादा व आधुनिक पध्दतीचे पिंजरे मागवले आहेत. माणीकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये सध्या 30 बिबटे आहेत.
जयराम गवडा, सहाय्यक वनरक्षक, जुन्नर