मुंबई – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली. तसेच यावर राज्यातील 13 कुलगुरुंशी चर्चा करण्यात आल्याचाही मुद्दा त्यांनी मांडला. यावेळी उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना किती दिवस संभ्रमात ठेवायचे असाही सवाल केला. यूजीसीसोबत पत्रव्यवहार करुनच राज्य सरकारने अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, असेही त्यांनी नमूद केले.
उदय सामंत म्हणाले, अनेक लोकांनी मी यूजीसीला पत्र का लिहिले असा प्रश्न विचारत आकांडतांडव केले. मी 17 मे रोजीच यूजीसीला अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. राज्यातील सर्व कुलगुरुंसोबत चर्चा केली. मी अनेक तज्ज्ञांशीही बोललो. त्यांनी परीक्षा न घेण्याबाबतच मत नोंदवले. यानंतर आपतकालीन समितीची देखील बैठक झाली. यात अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत देखील यूजीसीला पत्र देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
मात्र, यूजीसीने 2 ते 3 दिवसांपूर्वी पत्र पाठवत गाईडलाईन्स पाठवल्या. या गाईडलाईन्समध्ये त्यांनी परीक्षा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे निर्देश दिले. तसेच पुढचं काय होणार यावर नियोजन न करता पुढे जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही निर्णय घेऊ, असे म्हटले. यामुळे सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमात ठेवायचं असंच चित्र दिसत आहे, असेही सावंत म्हणाले.