तुमच्या खात्यात किती कंपन्यांचे शेअर असावेत? (भाग-१)
आदर्श स्थितीत खात्यात किती कंपन्यांचे शेअर असावेत?
खात्यातील कंपन्या वाढल्या की विविधता वाढते त्यामुळे आपोआपच जोखिम कमी होते. विविधता म्हणजे खात्यातील वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर विशिष्ट परिस्थितीवर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतात. सगळ्याच शेअरमध्ये एकाचवेळी घसरण होत नाही आणि खात्याचे मूल्य संतुलित राहते.
साधारण गुंतवणूकदाराने खात्यात जास्तीत जास्त म्हणजे 15-20 कंपन्यांचे शेअर ठेवावेत. खात्यातील प्रत्येक शेअरच्या किंमतीवर आणि कंपनीवर नियमितपणे लक्ष असावे लागते. त्यासाठी जाणीवपूर्वक अभ्यास, ज्ञान मिळवणे आणि त्यासाठी वेळ देणे आवश्यक ठरते. त्यासाठी कंपनीची चार तिमाहीतील कामगिरी, वार्षिक ताळेबंद अभ्यासणे आणि कंपनीसंदर्भातील तसेच कंपनी ज्या क्षेत्रात काम करते त्याविषयीच्या बातम्यांचा मागोवा ठेवणे आवश्यक असते. या बातम्या मिळण्यासाठी अलर्ट सेवेचा वापर करता येऊ शकतो. सध्याच्या काळात इंटरनेटमुळे प्रचंड माहिती उपलब्ध झाली असली तर त्यातील आपल्या उपयोगाची माहिती कोणती हे टिपून घेणे कौशल्याचे काम बनले आहे. आपण जितक्या कंपन्यांचा आणि क्षेत्रांचा मागोवा प्रभावीपणे ठेऊ शकतो तेवढ्याच कंपन्यांचे शेअर खात्यात असावेत हा एक निकष पाळावा.
या संदर्भात गुंतवणूकगुरु वॉरेन बफे यांचे मतही विचारात घेणे महत्त्वाचे ठरते. ते म्हणतात, आमच्या कंपनीचे गुंतवणुकीचे धोरण म्हणजे नेहमी घसघशीत गुंतवणूक असावी. जेव्हा कंपनीचा व्यवसाय आणि शेअरची प्राईस फार आकर्षक नाही असे आमचा अभ्यास सांगतो तेव्हा आम्ही थोडी इकडे थोडी त्यात अशी गुंतवणूक करणे टाळतो. जेव्हा कंपनीची व्यवसायातील क्षमता स्पष्ट होते तेव्हा त्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यावर आमचा विश्वास असतो.
आपल्या मनाची शांती हरवू नये आणि चिंता वाढू नयेत इतपतच खात्यात विविधता असावी आणि हा विचार करूनच खात्यात किती कंपन्यांचे शेअर असावेत याचा निर्णय घेणे योग्य ठरते. कारण शेवटी जितक्या जास्त संख्येने तुमच्या खात्यात कंपन्या हजर होतील तितका तुमच्या खात्याच्या एकूण कामगिरीवर प्रतिकूल परिणाम होत असतो. कारण चांगली कामगिरी करणाऱ्या शेअरचा खात्याच्या एकूण परताव्यावर अतिशय अल्प परिणाम होत असतो. त्यासाठी आधीपासून खात्यात असलेल्या कंपन्यांच्या कामगिरीच्या क्षमतेचा विचार करा. कारण त्या कंपन्यांचा व्यवसाय, संधी, वाढ या सगळ्यांचा अभ्यास करून तुम्ही त्या कंपन्यांचा शेअर खरेदी केले आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी नवी कंपनी शोधण्यापेक्षा खात्यातील चांगली कामगिरी करणाऱ्या शेअरच्या संख्येत भर घालत राहणे अंतिमतः फायद्याचे ठरते.
– चतुर