राहाता, दि. 30 (प्रतिनिधी) – राज्य सरकारने दुसर्या लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस मुख्यमंत्र्यानी केलेल्या घोषणांची किती अंमलबजावणी मंत्री आणि विभागाकडून झाली, असा सवाल भाजपचे ज्येष्ठनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
आ. विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात दुसर्या लॉकडाऊनवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्याच्या मागील घोषणे नंतरही गरजुंना धान्य मिळालेले नाही. सामान्य माणसाची उपासमार सुरूच आहे. किमान झालेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
लसीकरणासाठी पंतप्रधानानी पुढाकार घेतला. पण केंद्र सरकारचा लसीकरणात दुजाभाव हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा आरोप आश्चर्यकारक वाटतो. एकीकडे राज्यात सर्वाधिक लसीककरण झाले म्हणून सरकार पाठ थोपटून घेतय. मग केंद्राच्या सहकार्याशिवाय हे लसीकरण झाले का? आपण काय बोलतोय याचेही भान महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी ठेवायला हवे. एक मे पासून लसीकरणासाठी सर्वच राज्यांनी पुढाकार घेतला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेले पत्र म्हणजे स्वतःची अब्रू झाकण्याचाच प्रकार आहे. एक वर्षापासून कोविड संकट आहे. महसूलमंत्र्याना सुविधांचा अभाव असल्याचे आज कळाले का? फक्त फार्स करायचा आणि स्वतःचे अपयश झाकण्यासाठीचा हा पत्रव्यवहार आहे.
मानवतेच्या भावनेतून आणली रेमडेसिविर..!
खा. डॉ सुजय विखे यांनी रेमडीसिव्हर इंजेक्शन आणल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर भाष्य करण्यास विखे पाटील यांनी नकार दिला. न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. डॉ. सुजय यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून काम केले असल्याचेही ते म्हणाले.