दौंडच्या जनतेला पडलेला प्रश्न
यवत- शरद पवार यांना मुख्यमंत्री करणाऱ्या स्व. सुभाष कुल यांच्या कुटुंबाला संपवण्याची भाषा व्यासपीठावर शरद पवार यांच्यासमोरच झाली, तरीही पवार एक चक्कार शब्दही का बोलले नाही, असा सवाल स्व. सुभाष कुल व त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेला पडला आहे.
दौंड तालुक्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दौंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी सभा घेण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या एका नेत्याने खालच्या पातळीवर टीका करीत कुल कुटुंबाला संपविण्याची भाषा केली आहे.
स्व. आमदार सुभाष कुल हे तत्कालीन कॉंग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध मोठ्या फरकाने निवडून आले होते. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये असणाऱ्या शरद पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी स्व. कुल यांनी 11 अपक्ष आमदारांना एकत्रित करत शरद पवार यांना विनाशर्त पाठिबा दिला व शरद पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी स्व. सुभाष कुल यांना मंत्री करावे, असा आग्रह सर्वांनी धरला होता; परंतु कुल यांनी मनाचा मोठेपणा दाखवत शरद पवार मुख्यमंत्री झाले यातच मला आनंद आहे, मला वगळून कोणालाही मंत्री करा, असे कुल यांनी सांगितले. त्यावेळी हर्षवर्धन देशमुख यांना मंत्री करण्यात आले होते. शरद पवार यांना सर्वोच्चपद मिळावे यासाठी प्रयत्न करणारे स्व. सुभाष कुल यांच्या कुटुंबीयांवर त्यांच्याच व्यासपीठावर टीका करीत असताना शरद पवार शांत कसे बसू शकतात याचेच आश्चर्य दौंड तालुक्यातील जनतेला वाटू लागले आहे. स्व. सुभाष कुल हे मितभाषी व सुसंस्कृत नेते म्हणून राज्यभर प्रसिद्ध होते. कुल कुटुंबियांचे दौंड तालुक्याच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे.
- “ती’ हिंमत पवारांनी का दाखवली नाही?
शरद पवार हे सुसंस्कृत नेते म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे कोणताही नेता चुकला तर त्याला थेट व्यासापीठावर समज देण्याची हिंमत देण्याची शरद पवार यांच्यामध्ये आहे मग त्यांनी ही धमक वरवंड येथील सभेत का दाखवली नाही? असा प्रश्न स्व. सुभाष कुल व त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेला पडला आहे.