मुंबई : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वेळेवर पगार न झाल्यानं त्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. भीमराव सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे.
दरम्यान, पगार होत नसल्याने सांगली जिल्ह्यातील एसटी कर्मचारी भीमराव सुर्यवंशी यांना आत्महत्या करावी लागली, ही शिंदे-फडणवीस सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे, असं म्हणत काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-सरकारवर टीका केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून आम्ही त्यांचे प्रश्न लावून धरू, कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असं आवाहन त्यांनी केले आहे.
नाना पटोले पुढे म्हणतात, ST कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिन्याला 360 कोटी लागतात पण सरकार फक्त 223 कोटींवर बोळवण करत आहे. ST कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी पैसे नाहीत परंतु जाहिरातबाजीवर उधळपट्टी करण्यासाठी मात्र शिंदे-फडणवीस सरकारकडे पैसे आहेत, अशी टीका देखील पटोले यांनी केली आहे.
ST कर्मचाऱ्यांसारखा MPSC विद्यार्थ्यांना चुना लावू नका, चॉकलेट हिरोंना विनंती – रोहित पवार
काही राजकीय पक्ष व स्वयंघोषीत नेत्यांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी ST चे विलीकरण करावे यासाठी मविआ सरकारच्या विरोधात वातावरण गढूळ केले होते. कोर्टाने निर्णय देऊनही संप मागे घेऊ दिला जात नव्हता. आज ही मंडळी गप्प का? विलीनीकरण करण्यापासून शिंदे-फडणवीसांचे हात कोणी बांधलेत? असा सवाल देखील नाना पटोले यांनी केला आहे.