अफ्रिका खंडातील माली देशातील महिलेने एकाच गर्भधारणेत नऊ बाळांना जन्म देऊन विक्रम नोंदवला आहे. हलिमा सिसे असे या 25 वर्षीय महिलेचे नाव असून तिला सात अपत्ये होतील असा अंदाज डॉक्टरांनी तपासणीत नोंदवला होता. प्रत्यक्षात तिने नऊ अपत्यांना जन्म दिला. यापूर्वी 2009 मध्ये अमेरिकेतील नाद्या सुलेमान नावाच्या महिलेने आठ अपत्यांना जन्म दिला होता. माली सरकारने तिची विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने विमानाने तिला मोरोक्कोतील रुग्णालयात पाठवले होते.
सध्याच्या काळात एकाचवेळी अनेक अपत्यांना जन्म देणे ही बाब साधारण मानली जाऊ लागली आहे. कारण अनेक दांपत्ये व्यंध्यत्वावर उपचार घेत असल्याने एकाचवेळी अनेक अपत्यांना जन्म देण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. व्यंध्यत्वावरील उपचारांमध्ये निरोगी बाळ जन्माला यावे दृष्टीने काळजी घेतली जाते, मात्र या उपचारातून जुळे, तिळे जन्माला येण्याच्या काही घटना घडत आहेत. त्यामुळे खरे तर आई आणि बाळांचा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
एका संशोधनविषयक संकेतस्थळावर 12 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखातील माहितीनुसार जगात जुळी जन्माला येण्याचे प्रमाणे ऐतिहासिक उच्चांकावर आहे. जगात दरवर्षी सुमारे सोळा लाख मुले ही जुळी किंवा तिळी असतात. संशोधकांनी शंभर देशांमधील नोंदी तपासल्या असता 1980 पासून जुळी अपत्ये जन्माला येण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. जगभरात जुळी जन्माला येण्याच्या प्रमाणात गेल्या चाऴीस वर्षात एक तृतीयांशाने वाढ झाली आहे.
जुळे कसे जन्म घेतात?
जेव्हा एकऐवजी अनेक शुक्राणू आणि बीजातून गर्भ तयार होतो तेव्हा तो दोन ठिकाणी विभागला जातो. प्रत्येक गर्भ हा गुणसूत्रांच्या भाषेत जवळपास सारखा आणि अनुवांशिकदृष्ट्या एकसारखा असतो. बहुतेकवेळा या दोन्ही गर्भाचे लिंग सारखेच असते. गर्भाशयात त्यांचे विभाजन केव्हा होते यावर त्यांच्यातील नंतरचा सारखेपणा अवलंबून असतो. अनेकदा जुळी मुले एकसारखी दिसत नाहीत त्यावेळी त्या गर्भाचे अस्तित्व दोन वेगळ्या बीजातून आणि शुक्राणूतून तयार झालेले असते. अशा गर्भातील भ्रूणांचे लिंग सारखे किंवा वेगळे असते. बराचवेळा अशी जुळी ही गर्भधारणेतून करण्यात येणाऱ्या उपचारांमुळे गर्भाशयात तयार झालेली असतात.
जुळे असतानाची जोखिम
साधारणपणे 250 प्रसूतीमागे एक जुळे असता तर दहा हजार प्रसूतीमागे तिळे जन्माला येतात. सात लाख प्रसूतींमागे एकाच वेळी चार अपत्ये जन्माला येण्याचा प्रसंग घडतो. साधारणपणे एकच गर्भ असणाऱ्या प्रसूतीचा कालावधी शेवटच्या मासिक पाळीपासून 37 ते 42 आठवड्यांचा असतो. जुळ्यांमध्ये हा कालावधी 40 आठवड्यांचा असतो पण बहुतेक प्रसंगात ती आधीच जन्माला येतात. जुळे असेल तर 35 आठवड्यात, तिळे असेल तर 33 आठवड्यात आणि चार भ्रूण असतील तर 30 आठवड्यात प्रसूती होते.
गर्भाशयात किती भ्रूण सामावतात?
ख्रिस्तोफर बीम यांनी 27 जानेवारी 2009 रोजी स्लेट या संकेतस्थळासाठी लिहिलेल्या लेखात या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ते म्हणतात, किती यापेक्षा गर्भाशयातील भ्रूणांचे वजन आणि आकार वाढत गेला आणि त्यांचे वजन 12 पौंडापेक्षा जास्त झाले की, प्रसूतीकळा सुरु होतात. परंतु आई आणि बाळांची सुरक्षितता म्हणून प्रसूतीकळा सुरू होण्याआधीच प्रसूती केली जाते. बहुतेकवेळा सीझेरियन करून प्रसूती केली जाते. हालिमा सिसेच्या बाबत हीच खबरदारी घेण्यात आली होती.
भारतातील जुळ्यांचे गाव
भारतातील केरळमध्ये एक जुळ्यांचे गाव आहे. या गावात मोठ्या संख्येने जुळी जन्माला येतात. यामागील कारण शोधताना डॉक्टरदेखील चक्रावून गेले आहेत. कोडिन्ही नावाच्या गावात सुमारे 200 कुटुंबे राहतात. त्यातील 220 घरांमध्ये जुळी अपत्ये जन्माला आली आहेत. जगात जुळी येण्याचे प्रमाण पाहिले तर या गावात ते प्रमाण सहापट असल्याचे दिसते.