मुंबई – चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत भारतातील घरांचे दर साधारणपणे 1.8 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेच्या या विषयावरील अहवालात देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी या तिमाहीत भारतातील घरांचे दर 2.7 टक्क्यांनी वाढले होते. याचा अर्थ गेल्या वर्षातील शेवटच्या तिमाहीपेक्षा या वर्षातील शेवटच्या तिमाहीत घरांच्या दरांमध्ये कमी वाढ झाली आहे. रिझर्व्ह बॅंक घराच्या नोंदणीचा आढावा घेऊन दर तीन महिन्याला घरांच्या किमती संदर्भातील अहवाल जाहीर करीत असते.
हा अहवाल तयार करण्यासाठी देशातील दहा मोठ्या शहरांतील घरांच्या आकडेवारीचा विचार केला जातो. त्यामध्ये अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, जयपूर, कानपुर, कोची, कोलकत्ता, लखनो आणि मुंबई या शहराचा समावेश आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीतील आकडेवारीमध्ये भारतातील घरांचे दर 3.1 क्क्यांनी वाढले होते.
करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता घरांची निर्मिती वाढत आहे. मात्र सिमेंट आणि पोलादाचे दर उच्च पातळीवर असल्यामुळे घरांच्या निर्मितीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये घरांच्या दरात वाढ करावी लागणार असल्याचे या अगोदर क्रेडाई या विकासकाच्या संस्थेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सध्या घराच्या कर्जावरील व्याज दर तुलनेने कमी आहेत. मात्र आगामी काळामध्ये व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरांचा उत्पादन खर्च वाढू शकतो. त्यामुळे सध्याची परिस्थिती घर खरेदी करण्यासाठी योग्य आहे असे समजले जाते. याअगोदर घरांचे व्याजदर बऱ्याच कमी पातळीवर होते. त्यामुळे देशातील बऱ्याच नागरिकांनी या काळात घर खरेदी करण्याचे निर्णय घेतले होते.