रोहित्र जळाले; लॉकडाऊनमुळे कर्मचारी उपलब्ध नाहीत
चिंबळी -वडगाव घेनंद (ता. खेड) येथील आळंदी रस्ता येथील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने गणेशनगर व आळंदी रस्त्याववरील अनेक घरे मिळून जवळ जवळ अर्धे गाव अंधारात गेले आहे. करोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे याचा फटका वीज ग्राहकांनाही बसतो आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून वडगाव घेनंद येथील अनेक कुटुंबे अंधारात बुडाली आहेत.
कोरोनामुळे रोहित्र दुरुस्त करणाऱ्या कंपन्यांना सुटी आहे. त्या ठिकाणी कामगार नाहीत, तसेच विद्युत विभागातही करोनाची खबरदारी म्हणून एकत्रित जास्त लोकं काम करणे शक्य नाही, खाजगी वाहतूक व्यवस्था बंद आहे, त्यामुळे या कामाला थोडा विलंब लागण्याची शक्यता असल्याचे विद्युत विभागातील अभियंत्यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे नागरिकांचे बाहेर फिरणे देखील बंद झाले आहे. त्यात उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरात वीज नसेल तर टीव्ही, फॅन, मोबाइल ही उपकरणे कशी चालणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर तातडीने उपाययोजना करून लवकरात लवकर अन्य ठिकाणी विद्युत रोहित्र उपलब्ध असेल तर ते बसवून द्यावे किंवा तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या एखाद्या रोहित्रावरून वीज पुरवठा सुरू करून घ्यावा, अशी मागणी वडगाव घेनंद येथील ग्रामस्थांनी केली आहे.