घरासह कार्समधील एअर कंडिशनर्समुळेही वाढते आहे उष्णता
– श्रीनिवास वारुंजीकर
पुणे – कॉंक्रीटचे रस्ते, आरसीसीच्या इमारती आणि इमारतींच्या काचा याचे वाढते प्रमाण पाहता जे तापमान वाढते आहे, त्यामुळे पुणेकरांना उकाडा असह्य होताना दिसतो. पूर्वीचे पंखे अथवा रुम कूलर्सची जागा आता एअर कंडिशनर्सनी घेतली आहे. त्यामुळे घरे आणि कार्समधले तापमान कमीतकमी राखण्यात यश येत असले तरी हे एअर कंडिशनर्स बाहेर उत्सर्जित करत असलेली उष्णता ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तामपान वाढीला अधिकच मदत करताना दिसते आहे. त्यामुळे या एअर कंडिशनर्सच्या संख्येवर मर्यादा आणणे आवश्यक ठरते आहे. त्यामुळेही पुण्याचे तामपान वाढत आहेच, हेही हवामान खात्याकडील नोंदींवरून दिसून येत आहे.
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) अर्थात भारतीय उष्ण मोसमी हवामान विभागाच्या पाहणीनुसार भारतातील दिल्ली वगळता अन्य कोणत्याही शहरापेक्षा पुणे शहराचे कमाल आणि किमान तापमान सातत्याने वाढताना दिसत आहे. आपल्या 40 वर्षांच्या निरीक्षणाच्या अहवालावरून संबंधित विभागाने पुणेकरांना काळजी घेण्याचा सल्ला या विभागाने मागील पाच ते सहा वर्षांत दिला असूनही, त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहिलेले नाही हे विशेष.
वर्ष 1971 ते वर्ष 2013 दरम्यान भारतातल्या दिल्ली, कोलकता, जयपूर, अहमदाबाद, मुंबई, नागपूर, बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांमध्ये कमाल व किमान तापमानांमध्ये 0.30 ते 0.50 अंश सेल्सियसची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये पुणे दिल्लीखालोखाल असून, या कालावधीत पुण्याच्या तापमानात 0.45 अंशाने वाढ झाली आहे. आयआयटीएमचा हा अहवाल जिनिव्हाच्या वर्ल्ड मेटरॉलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध करण्यात आला होता. विशेष म्हणजे, हे निष्कर्ष काढताना पुण्यासह देशभरातील 36 विविध शहरांच्या 1901 पासूनच्या तापमानाच्या नोंदींचा अभ्यास करण्यात आला होता.
पुण्यापासून अवघ्या 150 किमी अंतरावर असलेले महाबळेश्वर हे हिल स्टेशन जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण यावर्षी ठरले असताना आणि सातारा-सांगली-कोल्हापूर भागातली यावर्षीची पूर परिस्थिती माहिती असताना, पुणेकर अद्यापही पर्यावरणीय दृष्टिकोनातून शहराच्या विकास आराखड्याबाबत आग्रही नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सध्या बांधकामे सुरू असलेल्या 300 हून अधिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या (नवीन आणि रिडेव्हलप्मेंट) नजिकच्या भविष्यकाळातील विचार करता, वाढत्या आरसीसी इमारती, त्यातील पेव्हर ब्लॉक्स आणि कॉंक्रीटचे अंतर्गत रस्ते, प्रत्येक घरातला एकेक एअर कंडिशनर आणि घरटी किमान एका कारमधला एअर कंडिशनर या सगळ्याचा एकत्रित विचार केल्यास, आगामी दोनच वर्षांत पुण्याच्या तापमानाची परिस्थिती भयावहपासून भीषण पातळीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या पुण्यात सहसा किमान 18 अंश आणि कमाल 32 अंश सेल्सियस तापमानाच्या नोंदी होत असत, त्या पुण्यात आता कमाल 22 अंश आणि किमान 36 अंश सेल्सियस तापमान वाढते. कधी कधी हे तापमान चाळिशी पार करूनही जाते.