फेब्रुवारी 2021 मध्ये प्रत्यक्ष मोबाइल ऍपच्या माध्यमातून जनगणना
नगर – जनगणनेच्या कामासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. 1 मे ते 15 जून 2020 दरम्यान पहिल्या टप्प्यात घरांची यादी व कुटुंब पत्रक तयार केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष जनगणना 2021 मध्ये फेब्रुवारीत केली जाणार आहे. त्यासाठी येत्या मार्च महिन्याअखेरीपासून प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. कुटुंब पत्रक तयार करतांना कुटुंब प्रमुखाच्या माहितीसह कोणते अन्न खाता, मोबाईल व आधार नंबर, आई वडीलांची देखील माहिती घेण्यात येणार आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये होणारी प्रत्यक्ष जनगणना ही मोबाईल ऍपच्या माध्यमातून केली जाणार असून डिजिटल ऍपचा वापर करणाऱ्या प्रगणकासह वाढीव साडेसात हजार रुपये मानधन देखील देण्यात येणार आहे. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनंतर आता 2021 मध्ये जनगणना होणार आहे. मागील 10 वर्षांतील लोकसंख्यावाढीचा दरानुसार प्रगणक व पर्यवेक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. जनगणनेच्या आधी 1 मे ते 15 जून 2020 या 45 दिवसांच्या कालावधीत घरांची यादी व कुटुंब पत्रक तयार केली जाईल. तसेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अद्ययावत केले जाईल. 2011 च्या जनगणनेनंतर 2015 मध्ये रजिस्टर अद्ययावत करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी हे मुख्य जनगणना अधिकारी असून त्यांच्या नेतृत्वाखाली चार प्रमुख प्रशिक्षण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चार प्रमुख प्रशिक्षण अधिकाऱ्यांकडून येत्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 148 क्षेत्रिय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे क्षेत्रिय अधिकारी त्यानंतर एप्रिल महिन्यात प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार असून 1 मेपासून घरयादी व कुटुंब पत्रक तयार करण्याच्या कामाला सुरवात होणार आहे.
एका प्रगणकाकडे 150 ते 200 कुटुंबे देण्यात येणार असून त्यांची लोकसंख्या किमान 650 ते 800 पर्यंत असेल. चार ते पाच प्रगणकांसाठी एक पर्यवेक्षक असले. त्यांच्यावर चार्ज अधिकारी असतील. प्रगणकांचे गट तयार केले जाणार आहे. या गटांमार्फत इमारती व घरे यांना अनुक्रमांक दिले जाणार आहेत. जनगणनेचे काम प्रत्यक्ष लेखी स्वरूपात व ऍपद्वारे असे दोन्ही प्रकारे केले जाणार आहे. घरयादी तयार करतांना जमिन, जागा, घरावर कोणते छत यासह इमारतीचा वापर निवास की वाणिज्य याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच घरामध्ये असलेल्या सुविधाची माहिती घेतली जाणार आहे.
पाणीयोजना, मलनि:सारण, वाहतूक प्रश्न, घरांचे प्रश्न, खेळाच्या जागा, आरोग्यसेवा सुविधा, सुरक्षितता व घरामधील मालमत्ता माहिती घेतली जाणार आहे. टिव्ही, मोबाईल, लॅपटॉप, संगणक, मोटारगाडी, यासह कुटुंब कोणते अन्न खाते याची माहित घेतली जाणार आहे. कुटुंबपत्रकात घरातील प्रत्येकी तीन सदस्यांची माहिती घेण्यात येणार आहे. कुटुंब प्रमुख माहिती देण्यास उपलब्ध नसेल तर अन्य उपलब्ध व्यक्तींची सविस्तर माहिती घेण्यात येणार आहे.
जन्मतारीख, जन्मस्थळ, पासपोट नंबर, पत्ता, आई-वडीलांची जन्मतारीख, जन्मस्थळ, आधार व मोबाईन नंबर घेण्यात येणार आहे. 9 फेब्रवारी ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान प्रत्यक्ष शिरगणती होणार आहे. मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही जनगणना होणार आहे. पहिल्यांदा अशा पद्धतीने डिजिटल ऍपच्या माध्यमातून जनगणना होणार आहे. हाताने लिखान करणाऱ्यांना 15 हजार तर ऍपच्या माध्यमातून माहिती अपलोड करणाऱ्यांना 22 हजार 500 रुपये देण्यात येणार आहे. दोन्ही टप्प्यात डिजिटलचा वापर केला तरच ते मानधन मिळणार आहे.
जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली जनगणनेचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रमुख प्रशिक्षण अधिकारी म्हणून मार्च महिन्यात क्षेत्रिय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. डिजिटल ऍपवर अपलोड करण्यात आलेली माहिती वरीष्टांना दिसणार आहे. त्यामुळे कोण काम करते की नाही हे लगेच समजणार आहे. पैसे देखील टप्पानिहाय देण्यात येणार आहेत.
चंद्रशेखर देशमुख, उपजिल्हाधिकारी, भुसंपादन