पुणे – खडकवासला धरणसाखळी पाणलोट क्षेत्रांत पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विसर्ग सुरू आहे. परिणामी, मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जनासाठी नदीपात्रातील तात्पुरते हौद यंदा नदीपात्राबाहेर उभारले जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यासाठी तयारी सुरू केली असून सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशी बाग, केसरीवाडा तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासह, भाऊ रंगारी मंडळ त्यांच्या गणपती मूर्तीचे विसर्जन विशेष व्यवस्था करण्यात आलेल्या हौदात करतात. त्यासाठी पांचाळेश्वर आणि पतंगा विसर्जन घाट परिसरात टेज तसेच मांडव घालून हे स्वतंत्र हौद तयार केले जातात. मात्र, यंदा ही व्यवस्था झालेली नाही. यंदा खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग अजूनही सुरूच असून सहा दिवस नदीपात्रातील रस्तेही बंद करण्यात आले.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विसर्जन अवघ्या तीन दिवसांवर आले, तरी हे विसर्जन हौद उभारलेले नाहीत.
गणेश मंडळांशी पालिकेची चर्चा
पाणी ओसरले, तरी नदीपात्रात चिखल आहे. त्यामुळे तेथे हौद उभारणे अशक्य आहे. तसेच, हौद उभारले आणि नंतर जादा पाणी सोडावे लागल्यास हे तात्पुरते हौद वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेकडून या मानाच्या मंडळांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यात आली आहे. हे हौद पात्राबाहेर बांधण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठीचे साहित्य पुलाची वाडी आणि पांचाळेश्वर घाट येथे प्रशासनाने साहित्य आणून ठेवले आहे.