मुंबई – करोनामुळे राज्याचा गाडा विस्कळीत झाला असून, आर्थिक ताण वाढत चालला आहे. यामुळे राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठे पाऊल टाकले आहे.
त्यानुसार येत्या 5 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणे आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हॅंडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.
राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मुंबईतील डबेवाल्यांनाही राज्य सरकारने दिलासा दिला आहे.
दरम्यान, शाळा, महाविद्यालयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याआधी ठरविल्यानुसार 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. याशिवाय चित्रपटगृह, स्वीमिंग पूल सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही.
यास परवानगी
– राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेस परवानगी
– पुणे विभागातील लोकल ट्रेन होणार सुरू
– डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
– मुंबई महानगर प्रदेशमधील लोकल फेऱ्या वाढणार
हे राहणार बंद
शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क.