पुणे – भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित नागरिक एका नामांकित बिर्याणी हाऊस मध्ये कामाला असून त्याचे मालक आणि व्यवस्थापक यांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेत फाशी घेतली, असा आरोप त्यांच्या पत्नी यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज केला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
प्रभाकर जयराम कांबळे (रा. भारती विद्यापीठ परिसर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नी प्रभावती कांबळे यांनी लेखी तक्रार अर्ज दिला आहे. कांबळे हे मागील चार वर्षांपासून येथील नामांकित बिर्याणी हाऊस याठिकाणी कामाला होते. मागील महिन्यात त्यांची आई आजारी असल्याने ते त्यांच्या मूळ गावी गेले होते. यामुळे कामावर जाऊ शकले नाहीत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ते गावावरून परत आले. ते आल्यानंतर रात्री एक वाजता बिर्याणी हाऊसचे मालक आणि व्यवस्थापक कांबळे यांच्या घरी आले. यावेळी त्यांनी कांबळे यांना बेदम मारहाण केली होती.
तसेच, जिवे मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले. त्याच भीतीतून प्रभाकर कांबळे यांनी दुसNयाच दिवशी दुपारी फाशी घेतल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रभावती कांबळे यांनी केली आहे. मारहाण केल्यामुळेच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे कांबळे यांनी पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रार अर्जात म्हंटले आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.
कांबळे यांनी पोलिस स्टेशनला लेखी अर्ज केला आहे. परंतु त्या विधिकरिता त्यांच्या मूळगावी गेलेल्या आहेत. त्या परत आल्यानंतर याबाबत चौकशी करून पुढील तपास केला जाईल.
आशिष कवठेकर, सहायक पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे