भाजी विक्रेता म्हणून व्यावसायाची सुरवात करणाऱ्या एका ध्येयवेड्या तरूणाची ओळख आता हॉटेल व्यावसायातील “सवाई’म्हणून अवघ्या जिल्ह्यात झाली आहे. तरकारी विक्री, मालवाहतूक रिक्षा असे काबाड कष्ट करीत हॉटेल व्यावसायात यशाची चव चाखणाऱ्या अजित गोळे यांची ही कहाणी युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
गोळे कुटुंबाने सुरुवातीपासूनच अतिशय हलाखीत दिवस काढले. तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नात घराच्या संसाराचा गाडा आई ओढत असताना अजित यांचे वडील उत्तमराव गोळे हे त्या काळात गवंडी काम करीत होते. या कामात फार कमी पैसे मिळत होते. कुटुंब चालविणे तसे जिकीरीचे होते; पण, काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. हे त्यांच्या लक्षात आल्यावर काही तरी नवीन व्यवसाय सुरू करून पाहू, असा विचार करीत त्यांनी तरकारी (भाजीपाला) विक्री व्यवसाय सुरू केला. पण, हा व्यवसाय दिसतो तितका सोपा नाही. मात्र, पर्याय नसल्यामुळे यातच गोळे यांनी जिद्दीने काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अजित हे 10वीत शिकत होता. वडिलांचा व्यवसाय मोठा करायचा असेल तर तरकारी आणण्यासाठी स्वतःचे वाहन हवे, असा हट्ट अजित यांनी धरला. काही दिवसांनी मुलाचा विचार वडिलांना पटला. नंतर मालवाहतूक रिक्षा घेतली. रात्री एक ते पहाटे सातपर्यंत अजित हे त्यांच्या वडिलांना मदत करीत होते. अशा पद्धतीने रात्री वडिलांना मदत आणि दिवसा शाळा, असा अजित यांचा दिनक्रम सुरू होता. मध्यंतरी पिंपरी सांडस येथील अमोल जमादार व संतोष घोगरे या दोन शेतकऱ्यांनी गाडीचे हप्ते भरण्यासही त्याला मदत केली आहे.
वाघिरे महाविद्यालयात वाणिज्य (कॉमर्स) विभागात प्रवेश घेऊन बी.कॉम.पर्यंत शिक्षण अजित यांनी पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी तरकारी व्यावसायाकडे आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले. आपले एखादे हॉटेल असावे अशा अजित यांच्या आईंची खूप इच्छा होती तसेच इतरांना भाज्या पुरविताना आपणही लोकांना यथेच्छ जेवू घालावे, असे वडीलांना वाटत असे यामुळेच हॉटेल व्यावसाय सुरू करण्याचे ध्येय मनात होतेच. परंतु, भांडवल नसल्याने तरकारच्या व्यावसायातून येणाऱ्या रकमेतील काही रक्कम हॉटेल उभारणीसाठी अजित हे साठवत राहिले. या व्यवसायात कोथिंबिरीचे व्यापारी सोमनाथभाऊ कुलट व कै. बाळासाहेब होले तसेच जिवाचा मित्र म्हणून अमोल पवार यांचे मार्गदर्शन लाभले. बऱ्यापैकी पैसे गाठीला जमल्याने हॉटेल सुरू करण्याचा निर्णय झाला. पालखी महामार्गावर झेंडेवाडी येथे असलेल्या 20 गुंठे जागेत सुधारणा केली. स्वत:कडील सात लाख व मित्र, नातेवाईक यांची मदत घेत 10 लाखांपर्यंत खर्च करून हॉटेल उभे केले. हॉटेल व्यावसायाचा अनुभव नसताना केवळ आई आणि वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजित यांनी जिद्दीने पावले टाकली. आज, या हॉटेलमध्ये 18 कामगार काम करीत असून या माध्यमातून रोजगारनिर्मितीचा प्रयत्नही अजित गोळे यांनी वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी केला आहे. या कामात माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधवराव यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे गाळे आवर्जून सांगतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जेव्हा आषाढीवारीसाठी जाते. त्यावेळी अवघड असा दिवेघाट चढून आलेल्या वारकऱ्यांच्या पायांना मसाज करण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविणारी पिंपरी-चिंचवडच्या “योग विद्या’ या संस्थेस ते मोफत येथील जागा देत त्यांच्या जेवणाचा खर्चही करतात. तसेच, मोफत पाणी वाटपही उपक्रम राबवितात. झेंडेवाडी गावात सामाजिक उपक्रमात त्यांचा मोलाचा सहभाग असतो. विशेष म्हणजे अजित गोळे उत्तम निवेदक असून उत्तम हॉटेल व्यावसायिक म्हणूनही त्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे.
संकलन: निलेश जगताप,सासवड