मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून त्यात १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेवर सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच घटनेतील दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे मंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाकडून भंडारा येथील घटनेसाठी सरकारला जबाबदार धरण्यात येत आहे. भाजप आमदार राम कदम यांनी नवजात शिशू केअर युनिटमधील बालकांचे मृत्यू म्हणजे हत्या असल्याचे म्हटले आहे. तर राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. या घटनेसाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. घटनेसाठी जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
The government has ordered a high-level investigation into the incident. Those found responsible for negligence will be strictly punished: Maharashtra Home Minister Anil Deshmukh on the death of 10 infants at #Bhandara hospital pic.twitter.com/pjzTjn7rVV
— ANI (@ANI) January 9, 2021
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील नवजात शिशु केअर युनिटमध्ये मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. यामध्ये धुरामुळे गुदमरुन 10 बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात बालकांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.