मुंबई: राजस्थानातील राजकीय अस्थिरते मागे भाजपचाच हात असून कॉंग्रेस व विरोधकांची सरकारे पाडणे, आमदारांचा घोडेबाजार करणे हा सारा उद्योग भाजपकडूनच केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात त्यांनी हा आरोप केला आहे.
राजस्थानात राजकीय धाडस करून भाजपने नेमके काय मिळवले असा सवालही त्यांनी केला आहे. अशा प्रकारच्या राजकीय खेळ्यांनी देशाची लोकशाही वाळवंट होईल असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
देशापुढे आज अनेक गंभीर समस्या आहेत. करोनाचा प्रसार वेगात सुरू आहे, त्यातून अर्थ व्यवस्था पूर्ण ढासळत चालली आहे, चीनने लडाखमध्ये अतिक्रमण करून आपल्या 20 जवानांची हत्या केली आहे. या साऱ्या प्रकरणांकडे लक्ष देण्याऐवजी भाजपचे नेते कॉंग्रेसच्या अंतर्गत लाथाळीचा लाभ उठवत आमदारांचा घोडेबाजार करण्यात व्यस्त आहेत.
वास्तविक संपूर्ण देशावर भाजपचे राज्य असताना त्यांनी काही राज्यांमधील विरोधकांची सरकारे मान्य केली पाहिजेत, हेच लोकशाहीसाठी आवश्यक आहे. भाजपने मध्यप्रदेशातील सरकार पाडल्यानंतर राजस्थानातही असेच काही तरी होईल हे अपेक्षितच होते. राजस्थानात हे घडत असतानाच तेथे मुख्यमंत्री गेहलोत यांच्याशी संबंधित लोकांवर आयकराचे छापे घातले गेले हा प्रकारही गंभीरच असल्याचे सेनेने म्हटले आहे. पायलट यांना फोडण्यासाठी भाजपच्यावतीने ज्योतिरादित्य शिंदे हे प्रयत्नशील होते असा आरोपही शिवसेनेने केला आहे.