मुंबई-गृहमंत्रालयाने अन लॉक -1 जाहीर केल्यामुळे शेअर बाजारात उमेद परतली आहे. त्यामुळे सोमवारी शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी 879 अंकांनी म्हणजे 2.57 टक्क्यानी वाढून 33,303 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 245 अंकानी म्हणजे 2.57 टक्क्यांनी वाढून 9,126 अंकावर बंद झाला.
सकाळी सेन्सेक्स तब्बल 12 50 अंकानी वाढला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि टीसीएस या कंपन्यांचे शेअर आज वाढले. बजाज फायनान्स या कंपनीचा शेअर आज सर्वात जास्त म्हणजे 11 टक्क्यानी वाढला. याबाबत बोलताना आनंद राठी या संस्थेचे संशोधन प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले की, अनलॉकमुळे शेअर बाजारात उमेदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्याचबरोबर जागतिक शेअर बाजारातूनही सकारात्मक संदेश येत आहेत. या खरेदीच्या वातावरणामुळे आज ब्रेंट क्रुडचा 0.21 टक्क्यांनी वाढून 37.91 डॉलर प्रति पिंप झाला. रुपयाच्या मूल्यात आज आठ पैशाची सुधारणा झाली.