नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असताना आणि गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ दिल्लीत आंदोलन करत असलेल्या या शेतकऱ्यांच्या विरोधात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आंदोलन करणारे शेतकरी नसून मवाली आहेत. असे करून ते केवळ दलालांचीच मदत करत असल्याची टिप्पणी लेखी यांनी केली आहे.
शेतकरी आंदोलनावर तोडगा निघावा यासाठी एकीकडे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर सबुरीची भूमिका घेताना दिसत आहेत. आमची केव्हाही चर्चेची तयारी आहे व चर्चेतून मार्ग निघू शकतो असे आवाहन ते वारंवार करत असतानाच लेखी यांनी केलेले वादग्रस्त विधान गरम तेलात पाणी ओतण्याचे काम करणारे ठरले आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना लेखी यांनी पेगॅसस प्रकरणावरून उठलेल्या वादळावरही भाष्य केले. हा सगळा खोटारडा प्रकार आहे. त्या म्हणाल्या की संसदेचे कामकाज कसे बाधित करायचे याची एक यादीच कागदावर तयार करण्यात आली असून त्यानुसार कृती केली जाते आहे.
गोंधळ घालून भारताला बदनाम करण्याचा आणि लोकशाहीच्या सर्व स्तंभांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या देशातील लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्याच्या संदर्भात भारत सरकार संवेदनशील आहे. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. मात्र पेगॅससचा विषय उपस्थित करून जनतेच्या प्रश्नावरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.