जैसलमेर (राजस्थान) – देशाची सेवा करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आणि सेवा देणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या कुटुंबियांना शौर्य पदक तसेच सेवेत असलेल्या आणि सेवानिवृत्त जवानांना उत्कृष्ट सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान केले आणि सन्मानित केले. सीमा सुरक्षा दलाच्या 57 व्या स्थापना दिन समारंभात आज राजस्थानमधील जैसलमेर येथे केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाषण केले.
1965 मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मोदी सरकारने देशातील सीमावर्ती जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाचा स्थापना दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही परंपरा यापुढेही चालू ठेवायला हवी. हा स्थापना दिवस आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षाचा स्थापना दिवस आहे, असे ते म्हणाले.
देशभरात सीमा सुरक्षा दल, पोलीस दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 35,000 हून अधिक जवानांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे आणि सर्वात कठीण सीमांच्या रक्षणाची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे देण्यात आली असल्यामुळे सीमा सुरक्षा दल यात आघाडीवर आहे. त्या सर्व हुतात्म्यांना आपण आदरांजली अर्पण करत आहोत, असे ते म्हणाले.
सीमा सुरक्षा दलाला अतिशय गौरवपूर्ण इतिहास आहे.1965 च्या युद्धानंतर सीमा सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आज हे सीमांचे संरक्षण करणारे जगातील सर्वात मोठे दल आहे.पर्वत , वाळवंट, जंगले आणि कोणत्याही प्रकारचे भौगोलिक वातावरण असो, सीमा सुरक्षा दलाने प्रत्येक परिस्थितीत शौर्य आणि उत्कृष्ट सेवेचा परिचय दिला आहे, असेही शहा म्हणाले.