मंचर -करोना काळ सुरू झाल्यापासून देशातील आणि राज्यातील विविध खासगी दूरसंचार कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून ग्रामीण व शहरी भागात वैयक्तिक जोखीम पत्करून दिवस-रात्र तांत्रिक बिघाड तात्काळ दूर करून लोकांना अविरत इंटरनेट व दूरसंचार सेवा पुरविली आहे.
करोनाकाळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दूरसंचार कंपन्यांमधील नेटवर्क ऑपरेशन्स व मेंटेनन्स विभागातील कर्मचाऱ्यांना फ्रंन्टलाइन कोविड-19 कर्मचारी’ म्हणून राज्य व केंद्र शासनाने मंजुरी देऊन सन्मानित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय दूरसंचार मंत्री डॉ. रवी शंकर प्रसाद यांच्याकडे पत्रव्यवहार करून केल्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.
यासंदर्भात माजी खासदार आढळराव पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील आरोग्य आणि पोलीस यंत्रणांनी करोना वॉरिअर्स म्हणून आजपर्यंत उत्कृष्ट सेवा बजावली आहे. राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून इंटरनेट आणि दूरसंचार यंत्रणेचा वापर कमालीचा वाढल्याने अखंडित मोबाइल नेटवर्क सुविधा
आणि जास्तीत जास्त पारदर्शक सेवा पुरविण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात वाढून या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरीक्त ताण निर्माण होऊनही त्यांनी हे आव्हान लिलया पेलले व नागरिकांना उत्तम व सुरळीत सेवा पुरविण्याची जबाबदारी कसोशीने पार पाडली आहे.
ऑनलाइन संपर्कात राहण्याचे उल्लेखनीय कार्य
नागरिक आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने एकमेकांच्या संपर्कात राहता यावे, यासाठी ऑनलाइन क्लासेस, ऑनलाइन परीक्षा, व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे होणाऱ्या शासकीय आढावा बैठका,
आरोग्य तपासणी व त्यांचे रिपोर्ट, टेजलमेडिसिन सुविधा,ऑनलाइन पेमेंट तसेच वर्क फ्रॉम होम आदी इंटरनेटवर आधारित सुविधा अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे काम उल्लेखनीय असून या कामाची सरकारकडून दखल घेणे आवश्यक आहे.
गोव्याने दिला फ्रंटलाइन कर्मचारी दर्जा
गोवा राज्याने देखील नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत टेलिकॉम नेटवर्क सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन कोविड कर्मचारी म्हणून दर्जा दिला आहे, तसेच केंद्र सरकारच्या पार्लिमेंटरी समितीने बॅंकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील करोना योद्ध्यांमध्ये समाविष्ट केले आहे.