‘प्रभात नारी सन्मान’च्या सन्मानार्थी नारींची भावना : मनोगतातून उलगडला प्रवास
पुणे – “समाजात चांगले करून दाखवण्याचा मानस ठेवून आम्ही प्रत्येकीने विविध क्षेत्रांत कार्य सुरू ठेवलेले आहे. याला सतत टीमची चांगली साथ मिळते आहे, हे महत्त्वाचे आहे. “प्रभात’ने आमच्या कार्याची दखल घेऊन आमचा सन्मान केला, याचा खूप आनंद होतो आहे. हा आमच्या टीम वर्कचा सन्मान आहे. या सन्मानाने आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. हा सन्मान आम्ही नक्कीच सार्थ ठरवू, असा विश्वास “प्रभात नारी सन्मान’च्या सन्मानार्थी नारींनी व्यक्त केला. पुणेकर रसिकांच्या प्रचंड उत्साहात आणि अलोट गर्दीत बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवारी रंगलेल्या आपुलकीच्या कौतुक सोहळ्यात या दिग्गज महिलांचा प्रभात परिवारातर्फे गौरव करण्यात आला.
प्रत्येक क्षण आनंददायी जावा, यासाठी हास्याची गरज; नवचैतन्यदायी हास्ययोगी सौ. सुमनताई काटे यांचे मार्गदर्शन
“आज धकाधकीच्या जीवनात आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंददायी जावा, यासाठी हास्याची गरज आहे, असे मार्गदर्शन नवचैतन्यदायी हास्ययोगी सौ. सुमनताई काटे यांनी केले. व्यक्तीगत पेक्षा त्या-त्या कार्याची ओळख नागरिकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. हास्यक्लबला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. याचा 15 हजार जणांना विनामूल्य फायदा झालेला आहे. पुणेकर जे स्वीकारतात ते सर्व जग स्वीकारते. हास्याची चळवळ पुढे नेण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वांचा मोलाचा वाटा मिळणे गरजेचे आहे,’ असे काटे म्हणाल्या. त्यांनी केक कापण्याबाबतचा हास्याचा प्रकार सादर केला. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजराने उत्तम दाद दिली. कुटुंबीयांनी सतत सहकार्य केल्यामुळे “प्रभात’ने केलेला सन्मान हा माझा एकटीचा नसून तो कुटुंबीयांचा आणि संपूर्ण टीमचा सन्मान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
स्वत:साठी कोणीही जगते, दुसऱ्यासाठी जगा; वनवासींच्या उत्थानकर्त्या ठमाताई पवार यांचे आवाहन
“वनवासी समाज भरकटलेला असल्याचे अनेकदा आढळले. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करण्याची इच्छा निर्माण झाल्याने त्या दिशेने वाटचाल केली. स्वत:साठी कोणीही जगते. दुसऱ्यासाठी जगले पाहिजे, हे संस्कार झाल्याचा आनंद वाटतो आहे,’ अशा भावना वनवासींच्या उत्थानकर्त्या ठमाताई पवार यांनी व्यक्त केल्या. “मी कधीही शाळेची पायरी चढले नाही. मात्र, आता वनवासी समाजातील मुलांच्या शिक्षणांसाठी कार्य सुरू ठेवले आहे. यातूनच राज्यात 18 ठिकाणी वनवासी कल्याण आश्रम सुरू झाले आहेत,’ असे त्यांनी सांगितले. या कार्याची दखल केंद्र शासनाने घेऊन गौरव केल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
जटामुक्तीच्या खंद्या कार्यकर्त्या नंदीनीताई जाधव यांचे गौरवोद्गार; ‘प्रभात’ने कौतुकाची थाप दिली
“चांगल्या कार्याची दखल घेऊन “प्रभात’ने सन्मान करत पाठीवर कौतुकाची थाप दिली. यातून कार्याला आणखी प्रेरणा मिळणार आहे,’ असा विश्वास जटामुक्तीच्या खंद्या कार्यकर्त्या नंदीनीताई जाधव यांनी व्यक्त केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून महिलांचे आंतरिक व वैचारिक सौंदर्य वाढविण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू ठेवले आहे. 165 महिलांचे जटनिर्मूलन केले आहे. महिलांचे समुपदेशन करण्याचे कार्य सतत सुरू आहे. जोगत्यांचेही प्रबोधन केले आहे. अंधश्रद्धेबाबत समाजातील गैरसमज दूर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे जाधव यांनी नमूद केले.
…आणि उपस्थितांचे डोळे पाणावले
अनुराधा प्रभूदेसाई यांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दचे त्यांचे अनुभव सांगितले. यावेळी “एका मोहिमेवर तैनात असलेल्या आणि 18 दिवसांपासून कोणतीही माहिती न मिळालेल्या सैनिकाच्या गर्भवती पत्नीला पाहून मी अस्वस्थ झाले. तिच्याशी बोलण्याची माझी हिंमत होत नव्हती. त्यामुळे तिला टाळून मी दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते.’ तितक्याच तीच माझ्याजवळ आली आणि म्हणाली “काय मावशी तू इतकी चिंता का करतेस? लष्करामध्ये नो न्यूज इज गुड न्यूज असते, हे माहितीये ना तुला.’ असे म्हणत ती मला कॉफी पिण्यासाठी घेऊन गेली. या सैन्यपत्नींचा संयम, धीर हा अपल्याला खूप काही शिकवतो हा अनुभव त्या सांगत होत्या, असे अनुभव ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
जवानांच्या कार्याबद्दल कायम आदर ठेवा; सैनिकांच्या “मासी’ अनुराधाताई प्रभुदेसाई यांचा सल्ला
“देशाच्या सरंक्षणासाठी लढणाऱ्या व शहीद झालेल्या जवानांच्या कार्याचा प्रत्येक नागरिकाने कायम आदर ठेवला पाहिजे. जवानांची शक्ती कायम जागृत ठेवली पाहिजे,’ असा सल्ला “सैनिकांच्या मासी’ अशी ओळख असलेल्या अनुराधाताई प्रभुदेसाई यांनी दिला. जवानांच्या बलिदानामुळेच आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे. त्यांनी केलेल्या त्यागासाठी आपण लायक आहोत का, याचाही प्रत्येकाने विचार करावा, असेही त्यांनी सांगितले आहे. शूरवीर सैनिकांचे कार्य त्यांनी उदाहरणांसह विशद केले. सैनिकांच्या डोळ्यांतला अंगार अनेकदा पाहिला आहे. सैनिकांच्या घरातील स्त्री शक्तीही पाहिली असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. समाजातील पोत सुधारण्यासाठी सर्वांनीच साथ द्यावी,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हास्याच्या माध्यमातून कापला केक
कार्यक्रमात सुमन काटे यांना सन्मानित केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या सन्मानाला प्रतिसाद दिला. यावेळी हास्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी काटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत एका हास्य प्रयोगाचे सादरीकरण केले. त्यांनी प्रेक्षकांमधील सहकारी मकरंद टिल्लू आणि विठ्ठल काटे यांना आवाज देत, “तो 100 किलोचा केक आणा बरं’ अशी सूचना दिली. हे ऐकून प्रेक्षकांत या केकबाबत उत्सुकता वाढली आणि ते इकडे-तिकडे बघू लागले. थोड्याच वेळात हे दोघेही मंचावर उपस्थित झाले, ते हातात एक काल्पनिक केक घेऊन. यावेळी काटे यांनी उपस्थितांना आपल्या हातात केक आहे, अशी कल्पना करावयास सांगितली. त्यानंतर तो केक हसत-हसत कापायचा कसा हे दाखवले आणि सभागृहात हशा पिकला. अशा प्रकारे सभाहागृहातील प्रत्येकाने हास्यकेक कापत “प्रभात’च्या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
दैनिक “प्रभात’ने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पाच महिलांचा सन्मान केला, ही आनंददायी व प्रोत्साहन देणारी बाब आहे. महिलांचा सन्मान ही त्यांनी केलेल्या उत्तम कार्याची पोहोचपावतीच म्हणावी लागेल. सन्मान झालेल्या प्रत्येक महिलेने विशिष्ट क्षेत्रात काहीतरी विशेष कार्य केले आहे. सामाजिक कार्य करत असताना त्यातही हटके करुन दाखविणे व त्याचे वेगळेपण जपणे हे महत्त्वाचे असते.
– मृदुलताई जोगळेकर, डेप्युटी जनरल मॅनेजर, बॅंक ऑफ महाराष्ट्र
दैनिक “प्रभात’ने मला कार्यक्रमाला बोलावून व्यासपीठावर येण्याची संधी दिली. कर्तृत्ववान महिलांबरोबर बसण्याची व त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाली, याचा आनंद होत आहे. या महिलांचा प्रवास सर्वांना प्रेरणादायी आहे.
– ऐश्वर्या सोमाणी, जेमॉलॉजिस्ट, युवा उद्योजिका व श्री कृष्णा पर्ल्स प्रा.लि.च्या संचालिका
अभूतपूर्व…उत्स्फूर्त…हृद्य..! कर्तृत्ववान दामिनींचा ‘प्रभात’ने केला यथोचित गौरव
समाज घडविणाऱ्या ‘सुपर वुमन’चाही सन्मान