मुंबई : मुंबईसह राज्यात हनी ट्रॅपच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसत आहे. काही टोळ्या तरुणींच्या मदतीने अनोळखी तरुणांना स्वतःच्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर त्यांची संपूर्ण टोळी या तरुणांना किडनॅप करते आणि मग सुरु होतो ब्लॅकमेलिंगचा खेळ.
मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणारा एक तरुण अशाच प्रकारे हनी ट्रॅपचा शिकार झाला होता. सुदैवाने त्याचा मित्र आणि वकील नितू सिंग यांनी वेळीच त्याला मदत केली आणि तरुण या हनीट्रॅपमधून सुटू शकला. पैशांसोबतच त्याचा जीवही वाचला.
घाटकोपरमध्ये रहाणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणाला त्याच्या अट्टल गुन्हेगार असलेल्या मित्राने एक टोळीच्या मदतीने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं होतं. काही दिवसांपूर्वी त्याच्या फोनवर एक अज्ञात तरुणीचा फोन आला. त्या तरुणीने पीडित तरुणाशी ओळख वाढवली. त्यानंतर ते एकमेकांना लॉजवर भेटले. लॉजबाहेर येताच तरुणीच्या साथीदारांनी त्याला अपहृत केले आणि तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितली.
पैसे दिले नाहीत तर तुझ्यावर बलात्काराची केस करणार, तुझा मित्रांना आणि कुटुंबाला यात अडकवणार, अश्या धमक्या ही टोळी देऊ लागली. सुदैवाने या तरुणाला त्याचा मित्र आणि वकील नितू सिंग यांनी मदत केली. धीर दिला आणि त्याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र असे गुन्हे मोठ्या प्रमाणत घडत असल्याचे वकील देखील सांगत आहेत.
साहिल नाडर, रणजित मोरे, अरबाज खान या आरोपींना घाटकोपर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे साहिल नाडर हा पीडित तरुणाचा मित्रच आहे. त्यानेच हा सर्व ट्रॅप रचला होता. सध्या तिघा जणांना अटक केली असून यातील तरुणीसह आणखी आरोपींचा घाटकोपर पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला असे काही अनोळखी फोन आले, तर सावध राहा, हा हनी ट्रॅपही असू शकतो.