भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी आणि आपल्या बदल्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे प्रामाणिक अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाल्याने प्रामाणिक अधिकाऱ्यांचे सर्वच सरकारांना वावडे आहे की काय, अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारनेच दोन महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची आरोग्य खात्यात बदली केली होती. गेल्या दोन महिन्यांमध्येच या विभागालासुद्धा शिस्त लावण्याचे प्रयत्न तुकाराम मुंढे यांनी केल्याने त्यांची बदली पुन्हा एकदा करण्यात आली आहे. गेल्या पंधरा वर्षांच्या शासकीय सेवेमध्ये तब्बल 16 वेळा बदल्यांना सामोरे गेलेले मुंढे यांचा प्रामाणिक आणि धडाकेबाज कारभार कोणत्याच सरकारला परवडत नाही किंवा पचत नाही, असाच निष्कर्ष यातून काढावा लागतो. मुंढे यांच्या पंधरा वर्षांच्या शासकीय सेवेमध्ये महाराष्ट्र राज्याने जी सरकारे पाहिली त्या प्रत्येक सरकारच्या कालावधीमध्ये मुंढे यांच्या अनेक वेळा बदल्या करण्यात आल्या. कोणत्याच पदावर त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता.
एखाद्या जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी असो किंवा एखाद्या महापालिकेचे आयुक्त असो किंवा एखाद्या विभागाचे सचिव असो किंवा संचालक असो प्रत्येक ठिकाणी तुकाराम मुंढे यांनी आपल्या पद्धतीने काम सुरू ठेवल्यानेच अनेकांच्या अडचणी वाढू लागल्या. त्यांनी आपले राजकीय नातेसंबंध वापरून तुकाराम मुंढे यांची दरवेळी बदली केली. कोणत्याही पक्षाचे सरकार असो किंवा कोणत्याही विचाराचे सरकार असो प्रामाणिक आणि धडाकेबाज अधिकाऱ्यांचे सर्वांनाच वावडे आहे, असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. तुकाराम मुंढे यांनी जेव्हा आरोग्य खात्याचा कारभार हातात घेतला तेव्हाच अनेकांचे धाबे दणाणले होते. कारण करोना महामारीच्या कालावधीतच महाराष्ट्रातील सरकारी आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले होते. सप्टेंबर महिन्यात आरोग्य खात्याचे सहसंचालक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कामाचा धडाका लावला होता.
राज्याच्या आरोग्यव्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी त्यांनी अनेक नियम केले होते; पण त्यामुळेच अनेकजण अस्वस्थ झाल्यानेच अखेर नेहमीप्रमाणेच किल्ल्या फिरवून तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुकाराम मुंढे यांना फक्त तुम्हाला कार्यमुक्त करण्यात आले आहे पुढील आदेशाची वाट पाहा, असा आदेश देण्यात आला होता; पण आता मुंढे यांची नियुक्ती शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. देशातील या सर्वात महत्त्वाच्या देवस्थानच्या कारभारातही अधिक सुधारणा होईल. पण या निमित्ताने पुन्हा एकदा शासकीय सेवेत येऊन समाजासाठी काहीतरी करण्याची भावना मनात घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या माध्यमातून या सेवेत येऊ पाहणाऱ्या प्रामाणिक तरुणांचा मनोभंग होण्याची जास्त शक्यता आहे. शासकीय पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या ठराविक कालावधीनंतर होणे हा एक दैनंदिन कामकाजाचा भाग असला, तरी जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याची बदली वारंवार केली जाते आणि कोणत्याही पदावर त्याचा नेमून दिलेला कार्यकाल पूर्ण होऊ शकत नाही. तेव्हा त्या अधिकाऱ्याचा दोष नसतो तर तो अधिकारी प्रामाणिकपणे आणि नियमावर बोट ठेवून आपले काम करत आहे हाच त्याचा अर्थ असतो. प्रामाणिकपणे आणि नियमावर बोट ठेवून काम करणारे अधिकारी राजकीय नेत्यांना पसंत नसल्यानेच अशा अधिकाऱ्यांच्या सतत बदल्या केल्या जातात.
लोकशाहीतील नियमाप्रमाणे सत्ताधारी पक्षांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करण्याशिवाय नोकरशहाच्या हातात काहीही नसल्याने तुकाराम मुंढे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना बदलीच्या ऑर्डर स्वीकारून नव्या ठिकाणी नियुक्त होणे एवढा एकच पर्याय असतो. जेव्हा अशा एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याची अल्प कालावधीमध्येच बदली करण्यात येते तेव्हा जनतेनेच निषेधाची भावना प्रदर्शित करणे आवश्यक आहे. क्वचित अशा गोष्टी घडतात की, एखाद्या अधिकाऱ्याची बदली रद्द व्हावी म्हणून जनता आंदोलन करते; पण असे प्रकार खूप कमी घडतात. केंद्रीय लोकसेवा आयोग असो किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असो या संस्थांच्या माध्यमातून घेतलेल्या परीक्षेमुळे ज्या शासकीय नियुक्त्या होतात त्या नियुक्त्या म्हणजे उमेदवारांचे आयुष्यभराचे कल्याण असते. शिवाय वरकमाईचे एक साधन असते, ही गोष्ट आता गृहीतच धरली गेली असल्याने मुंढे यांच्यासारखे अगदी मोजकेच अधिकारी जनतेचे सेवक म्हणून या पदाकडे पाहत असतात. अर्थात भारताच्या लोकशाही रचनेप्रमाणे शासन आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या गेल्या असल्याने अनेक वेळा संगनमताने सर्व कारभार केले जातात. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य काम करणे अपेक्षित असते. पण अनेक वेळा राजकारण्यांचा हस्तक्षेप प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निर्णयात होत असल्यानेच त्यांना काम करण्यात अनेक अडथळे येतात. नियमबाह्य कामेही करावी लागतात.
सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेली खोके संस्कृती ही फक्त राजकारणापुरती मर्यादित नसून या संस्कृतीमध्ये शासकीय अधिकारी आणि नेते यांचे साटेलोटे असते, ही गोष्टही आता लपून राहिलेली नाही. अशा खोके संस्कृतीचा भाग होण्याची इच्छा नसणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची मात्र त्यामुळे अडचण होते.” न खुद खाऊंगा ना किसी को खाने दूँगा’ असा मंत्र जपणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या म्हणूनच सतत बदल्या केल्या जातात. मजेची गोष्ट म्हणजे तुकाराम मुंढे यांची जेव्हा अशा प्रकारे बदली होते तेव्हा विरोधी पक्ष नेहमीच तुकाराम मुंढे यांच्या बाजूने उभे राहतात; पण हेच विरोधी पक्ष एकेकाळी सत्ताधारी बाकावर बसलेले असतात आणि त्यांनीसुद्धा कधी ना कधी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची बदली केलेली असते.