पुणे – रत्नागिरी हापूस म्हटल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. लॉकडाऊनमध्ये फळांचा राजा असलेल्या आंब्याची चव चाखायची इच्छा झालीय. तर होय, तुमच्या सोसायटी, घरपोच आंबा मिळू शकतो. सोसायटी, घरी अथवा किरकोळ व्यापाऱ्यांनी किमान 10 पेटी घेतल्यानंतर शहरात हव्या त्या ठिकाणी कोणताही वाहतूक खर्च न आकारता आंबा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी सांगितले.
मार्केट यार्डातील फळ विभाग सध्या बंद आहे. अनेकांना आंबा खाण्याची इच्छा आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू केल्याचे काची यांनी सांगितले. ते म्हणाले, अक्षयतृतीया अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अक्षय तृतीयेला आमरस केला जातो. दरवर्षी या काळात आंब्याला मोठी मागणी असते. त्यामुळे आंबा घरपोच करण्याची ही योजना आहे. मात्र यासाठी सोसायटी, घरगुती ग्राहक अथवा किरकोळ विक्रेत्यांनी किमान दहा पेटी आंबा घेणे आवश्यक आहे. शहरात सध्या तीन ते चार हजार पेटीची आवक होत असून सध्या चार ते सात डझनाच्या पेटीस दर्जानुसार 1800 ते 3000 रुपये भाव मिळत आहे.